रायगड : पुढारी वृत्तसेवा : कोकणातील खासकरून रत्नागिरी, देवगड आणि रायगड जिल्ह्यातील हापूस हा जगप्रसिद्ध आहे. कोकणातील अडीच लाख मेट्रिक टन उत्पादनांपैकी 25 हजार मेट्रिक टन फळाची तर 10 हजार मेट्रिक टन मँगोपल्पची निर्यात होते. त्यामधून 340 कोटी रुपयांचे परकीय चलन मिळते. फळ बाजारात हापूस आंब्याची आवक वाढत असून परदेशातून देखील हापूसची मागणी वाढली आहे. कोकणातील 40 टक्के आंबा युरोप आणि आखाती देशात निर्यात होत आहे. रमजान महिना सुरू झाला असल्याने आखाती देशात हापूसच्या मागणीत आणखी वाढ होणार आहे. ज्याप्रमाणे भारतीयांना हापूस आंब्याने भुरळ घातली आहे, त्याचप्रमाणे परदेशी नागरिकांना देखील हापूसच्या चवीने भुरळ घातली आहे. त्यामुळे कोकणातील हापूस आंब्याला परदेशात मागणी वाढत आहे.
महाराष्ट्रात 5 लाख 66 हजार हेक्टरवर आंब्याची लागवड असून 3.31 लाख मेट्रिक टन आंबा फळांचे उत्पादन आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 1 लाख 13 हजार हेक्टर, सिंधुदुर्ग जिल्ह्यात 33 हजार 475 हेक्टर आणि रायगड जिल्ह्यात 14 हजार 500 हेक्टर क्षेत्रावर आंबा लागवड आहेे. यातून 2 लाख 60 हजार 500 मेट्रिक टन उत्पादन मिळते. हेक्टरी उत्पादकता 2.50 मेट्रिक टन आहे. कोकणात 1 लाख 60 हजार 975 हेक्टरवर लागवड आहे. कोकणातील हापूसला सर्वाधिक मागणी देशांतर्गत मुंबई, कोल्हापूर, सांगली, पुणे येथून आहे. त्याचबरोबर गुजरात, अहमदाबादलाही हापूस जातो. कोकणात हापूसमधली उलाढाल सुमारे 250 कोटी तर प्रक्रियेतून सुमारे 90 कोटीपर्यंत आहे.
कोकणातून 25 हजार मेट्रिक टन हापूस निर्यात होतो. आंबा पल्पला सौदी अरेबिया, नेदरलँड, युरोपीय देश, अरब देश, कुवेत, अमेरिका, जर्मनी व चीनमधून खूप मागणी आहे. कोकणातून 10 हजार मेट्रिक टन पल्पची निर्यात होते. त्यातून 90 कोटी 39 लाख परकीय चलन अपेक्षित आहे. दोन्ही मिळून सुमारे 340 कोटी रुपये परकीय चलन कोकणाला निर्यातीतून मिळते. निर्यात वाढविण्यासाठी वाहतूक सुविधेचा प्रश्न आहे. समुद्रमार्गे निर्यात होणार असेल तर त्याचा थेट फायदा स्थानिक शेतकर्यांना होऊ शकतो. त्याद़ृष्टीने प्रयत्न करण्याची गरज आहे.
पणन मंडळाच्या सुविधांचा वापर करून अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, युरोप, जपान, न्यूझीलंड, साऊथ कोरिया, मलेशिया इ. देशांमध्ये आंबा निर्यात होत असतो. परदेशी बाजारपेठेमध्ये अत्यंत चांगल्या पॅकिंगमध्ये एकसारखा आंबा निर्यात करणे आवश्यक असते. त्याचबरोबर फळांची प्रत चांगली असणे, फळांवर डाग नसणे, ओरखडे नसणे या बाबीही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. त्यासाठी 9 सुविधा केंद्रांमध्ये विविध प्रक्रिया करून हापूस आंबा निर्यात केला जाणार आहे.