कुरोली येथील सभेत बोलताना डॉ. दिलीप येळगावकर. Pudhari Photo
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

मी उमेदवार असताना घार्गेंची अस्मिता कुठे होती : डॉ. दिलीप येळगावकर

Maharashtra Assembly Polls | पाणी चळवळीशी विरोधकांचा सुतराम संबंध नाही

पुढारी वृत्तसेवा

खटाव : खटाव तालुक्याच्या अस्मितेच्या आणि सन्मानाच्या प्रभाकर घार्गे नुसत्या बाता मारत आहेत. 2009 साली मी विधानसभा निवडणुकीला उभा होतो तेव्हा त्यांनी माणच्या पोळ तात्यांचे काम केले होते. तेव्हा त्यांची खटाव तालुक्याबद्दलची अस्मिता कुठे गेली होती?, असा सवाल डॉ. दिलीप येळगावकर यांनी उपस्थित केला. आ. जयकुमार गोरेंच्या विरोधात एकत्र आलेल्यांचा पाणी चळवळीशी सुतराम संबंध नसल्याचेही त्यांनी सांगितले. सिध्देश्वर कुरोली येथे माण-खटाव विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आ. जयकुमार गोरे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी आ. जयकुमार गोरे, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. येळगावकर म्हणाले, मी 1989 पासून माण-खटावच्या पाण्यासाठी संघर्ष केला आहे. आत्ता जे विरोधात आहेत त्यातील कुणीच माझ्याबरोबर पाणी चळवळीत नव्हता. त्यांनी कधी पाण्यासाठी संघर्ष आणि आंदोलने केली नाहीत. आ. जयकुमार गोरेंनी विधानसभेत, मंत्रालयात खूप मोठा संघर्ष करुन जिहेकठापूर, उरमोडी, तारळीचे पाणी आणले आहे. या योजनांसाठी त्यांनी हजारो कोटींचा निधी खेचून आणला आहे. आता पाणी यायला लागल्यावर विरोधक श्रेय घेण्यासाठी पाणी चळवळींचा दिखाऊपणा करत आहेत. शरद पवारांनी मला पाण्याचे आश्वासन दिले होते. पण त्यांनी ते कधीच पूर्ण केले नाही. जयंत पाटलांनी तर टेंभूचे पाणी माण आणि खटावला देताच येत नाही, असे सांगितले होते. जयकुमार गोरेंनी मात्र फेरजल नियोजनातून अडीच टीएमसी पाणी आणले आहे.

डॉ. येळगावकर पुढे म्हणाले, ज्या राष्ट्रवादीने त्यांना त्रास दिला त्या राष्ट्रवादीसमोर प्रभाकर घार्गे नाक घासत आहेत. त्यांना आत्ता खटाव तालुक्याचा सन्मान आठवला आहे. 2009 साली मी विधानसभेला उभा होतो तेव्हा त्यांना मदत करण्याची विनंती केली होती. मी खटाव तालुक्यातील असूनही घार्गेंनी तेव्हा मला मदत केली नव्हती. तेव्हा त्यांची खटाव तालुक्याबद्दलची अस्मिता कुठे गेली होती. घार्गेंसाठी आम्ही बरेच काही केले आहे, मात्र त्यांनी आमचा विश्वासघात केल्याचेही येळगावकरांनी सांगितले.

औंधसह 21 गावांना आम्हीच पाणी देणार : आ. गोरे

सध्या सुरु असलेली लढाई जयकुमार किंवा घार्गेंची नाही. व्यक्तीगत कुणाच्या नावापुरती अस्मितेची नाही. ही लढाई मतदारसंघाच्या दुष्काळमुक्तीची आहे. माण-खटावच्या अस्मितेची आहे. घार्गे कधीच पाणीचळवळीत दिसले नाहीत. अकरा वर्षांपूर्वी औंध पाणी योजनेसाठी झालेले उपोषण श्रेयवादातून सोडवल्यानंतर ते कधीच प्रयत्नशील दिसले नाहीत. त्यांच्यामुळेच या योजनेला उशीर झाला असला तरी औंधसह 21 गावांना आम्हीच पाणी देणार असल्याचा विश्वास आ.जयकुमार गोरे यांनी यावेळी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT