नागपूर : राज्यातील जनता महायुती, महाविकास आघाडी दोघांनाही कंटाळली आहे. दोन्ही युती-आघाडीत जागावाटपामध्ये तिढा निर्माण झालेला आहे. आम्ही आघाडी आणि युती दोघांचाही पराभव करणार, राज्यात 4 नोव्हेंबरला सगळे चित्र स्पष्ट होईल, आमची महाशक्ती स्फोट करणार असा गौप्यस्फोट प्रहारचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांनी शुक्रवारी (दि.18) माध्यमांशी बोलताना केला.
भाजप आणि काँग्रेस एकच आहेत. अर्थकारणात काही बदल झालेला नाही. त्यामुळे आम्ही मुद्दे लोकांपुढे घेऊन जाऊ, चांगले उमेदवार आणि चांगले मतदारसंघ आमच्याकडेच असल्याचे दिसणार आहे. दरम्यान मनोज जरांगे पाटील संबंधात माझे काही बोलणे झालेले नाही. जसे इतर पडतात तसे मोठे नेतेही पडतील. उमेदवारांच्या ताकदीपेक्षा राजकारण महत्त्वाचे आहे. अर्ज मागे घेतल्यानंतरच सर्व चित्र स्पष्ट होईल. माझ्या मतदारसंघातील लोकांचा माझा विश्वास आहे आणि मी तिथूनच लढणार. राजन तेली किंवा इतर प्रवेश त्याबद्दल मला माहिती नाही. दरम्यान,मुख्यमंत्र्यांशी माझी चर्चा झाल्याची बातमी कुणी कशी चालवली मला माहिती नाही, मी त्या दिवशी हैद्राबादमध्ये होतो असे स्पष्ट केले.