राजकारणाच्या पटलावर बऱ्याच घटना घडत असतात. राजकीय नेतृत्व आपली भूमिका मांडत असतात. याच राजकीय नेत्यांबद्दल जनतेच्या मनात त्यांच्या खाजगी बाबींविषयी उत्सुकता असते. जस की त्यांच बालपण, शिक्षण, राजकीय प्रवास. आज आपण शरद पवार ते राज ठाकरे अशा दिग्गज नेत्यांच्या शिक्षणाबद्दल जाणून घेवूया.
महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रभावी नेतृत्व शरद पवार (Sharad Pawar) यांनी बारामती येथील सरकारी शाळेतून शालेय शिक्षण, तर पुणे विद्यापीठाच्या बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्समधून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले.
घराची जबाबदारी आणि तरुण वयात राजकारण- समाजकारणात आल्याने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे शिक्षण अकरावीपर्यंतच झाले, मात्र, शिकण्याची जिद्द असल्याने २०१४ मध्ये त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात प्रवेश घेतला. मराठी आणि राजकारण हे दोन विषय घेऊन उत्तीर्णदेखील झाले. शिक्षणाविषयी आस्था असल्याने त्यांनी मुलगा श्रीकांत शिंदे यांना डॉक्टर केले. श्रीकांत एकनाथ शिंदे हे एम. एस. (ऑर्थो.) आहेत.
राजकारण, समाजकारणात पुढे असलेल्या अजित पवार यांचे शिक्षण मात्र फारसे झालेले नाही. ते केवळ बारावी पास आहेत. त्यांचे पदवीपर्यंत शिक्षण होऊनही ते कधीही हे सांगत नाहीत. बी. कॉम. च्या शेवटच्या वर्षाला असतानाच त्यांचे वडील वारले आणि अजित पवार गावी बारामतीत परतले. पुढे कुटुंबाची जबाबदारी अंगावर पडली आणि दादांची पदवीची एक परीक्षा अपूर्णच राहिली. त्यामुळे ते बारावीपर्यंतच शिक्षण सांगतात.
देवेंद्र फडणवीस राजकीय धुरंधर आहेतच; पण त्यांचे शैक्षणिक प्रगतिपुस्तकही वरचढ आहे. नागपूरच्या शासकीय विधी महाविद्यालयातून त्यांनी कायद्याची पदवी मिळवली आहे. बिझनेस मॅनेजमेंटमध्येही पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतले आहे. जर्मनीतील डीएसई बर्लिन या संस्थेत डिप्लोमा इन मेथड्स अँड टेक्निक्स ऑफ प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये त्यांनी डिप्लोमा केला आहे.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू शिक्षणात नाही तर कलेमध्ये पारंगत आहेत. उद्धव ठाकरे एक उत्तम छायाचित्रकार आहेत, तर राज ठाकरे व्यंगचित्रकार, विशेष म्हणजे दोघांनीही कलेचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे.