नंदुरबार : महायुतीच्या सरकारने नंदुरबारमध्ये विविध लोकोपयोगी कामे केली आहेत. या बळावरच शहरी आणि ग्रामीण भागातील जनता विधानसभा निवडणुकीत मतदान करणार असल्यामुळे महायुतीचे सरकार स्थापन होताच विकासकामांचा धडाका पुन्हा सुरू करु, अशी ग्वाही नंदुरबार विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे भाजपा उमेदवार डॉ. विजयकुमार गावित यांनी नंदुरबारवासीयांना दिली.
सोनवद, कवठळ, लोंढरे, उजळोद, चिरखान, धांद्रे बु., धांद्रे खु., जयनगर, उभादगड, निंभोरा, मातकुट, बोराळे, कहाटुळ आणि अन्य गावांमधील मतदारांशी संवाद साधल्यानंतर महायुतीचे भाजपा उमेदवार डॉ. विजयकुमार गावित प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
डॉ. गावित म्हणाले, आदिवासी मंत्री म्हणून आपण नंदुरबारमधील रस्ते आणि गटारांवर पूल बनवले आहेत. अनेक गावांमधील पाणी प्रकल्प पूर्ण केले असून तरुणांना रोजगार दिला असताना आम्ही तीस वर्षात काय केले, असा प्रश्न विरोधक करत आहेत. परंतु, आम्हाला प्रश्न करणार्यांनी कोणती विकासकामे केली आहेत, हे जाहीर करावे. अन्यथा गटार रस्तेच्या ठेकेदारीत आमच्या विरोधी उमेदवाराने काय- काय केले, हे उघड करु, असा इशारा डॉ. गावित यांनी दिला.
आपण मला प्रत्येक निवडणुकीत निवडून देत आला आहात. त्यामुळे आज नंदुरबार जिल्ह्याचा विकास होत आहे. केंद्रातील मोदी सरकार आणि महाराष्ट्रातील महायुती सरकारने आतापर्यंत आपला जिल्हा आणि जिल्ह्यातील प्रत्येक घटकाला न्याय देणार्या योजना दिल्या आहेत.
भाजपा हा देशाची सुरक्षा सांभाळणारा, दलित- आदिवासी आणि वंचित घटकांचा अधिकार सुरक्षित ठेवणारा आणि कल्याणकारी योजना देऊ शकणारा एकमेव पक्ष आहे. मागील अडीच वर्षात आदिवासी विकास विभागाचा मंत्री म्हणून काम करताना या पक्षाच्या धोरणांमुळे आपल्या नंदुरबार जिल्ह्याला मोठा निधी मिळाला आहे. इतर सरकारच्या तुलनेत महायुतीच्या काळात अनेक विकासकामे झाली आहेत, अशी आठवणही डॉ. गावित यांनी यावेळी मतदारांना करून दिली.
ज्येष्ठ नेते दिपक बापू पाटील, जि.प.बांधकाम सभापती हेमलता शितोळे, जि.प.सदस्य के.डी.नाईक, भाजपा ज्येष्ठ नेते डॉ. कांतीलाल टाटिया, प्रकाशा मंडळाध्यक्ष विजय पाटील, रविंद्र राउळ, प्रशांत चव्हाण, उमेश पाटिल, रामराव बोरसे,संजय भदाणे,तुळशीराम कोळी,सुनील कुवर,कृष्णा कोळी,दिलवर माळचे यांच्यासह परिसरातील सर्व गावांचे सरपंच,उपसरपंच पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.