नागपूर :भाजपची दुसरी आणि तिसरी यादी लवकरच येणार आहे. प्रभावशाली उमेदवार देण्याचे,जिंकण्याचे सूत्र पक्षाचे आहे. त्या अनुषंगाने महायुतीत अजूनही चर्चा सुरू असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
उमेदवाराची निवड करताना परफॉर्मन्स नाही. तर त्यावेळेस उमेदवार जिंकण्याचे गणित महत्वाचे असते. कधी थांबावं लागते तर कधी संघटनेची जबाबदारी सांभाळावी लागते. परिस्थितीनुसार अनुकूल निर्णय घ्यावे लागतात असेही कामठीच्या उमेदवारीवरून एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.विद्यमान आमदार टेकचंद सावरकर यांचे तिकीट कापून बावनकुळे यांना देण्यात आले यामुळे त्यांनी आपल्याला विश्वासात घेतले नाही अशी नाराजी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर बावनकुळे म्हणाले, नागपूर जिल्ह्यातील उमरेड ही जागा परंपरागत भाजपची आहे. त्यामुळे भाजपकडे राहील. महायुतीच्या उमेदवाराचे चेहरे समोर येतील तेव्हा जनता महायुतीला मतदान करेल असा दावा केला.
दरम्यान,भाजपमधील राजी नाराजीबाबत बावनकुळे म्हणाले, ९९ जागा जाहीर झाल्या. काही ठिकाणी चार -पाच उमेदवार इच्छुक असतात. एका पदावर एकच व्यक्तीला संधी मिळू शकते.थोडी नाराजी असणारच आहे. जी यादी दिली त्यांना लोकनेते म्हणून पसंती आहे. पुढील यादी प्रभावी चेहऱ्याची असेल. महाविकास आघाडीत वाद सुरू आहे. महायुतीकडे विकासाचा अजेंडा आहे.मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सामाजिक आंदोलन उभे केले, त्यांना वाटतं त्यांचे आमदार निवडून आले तर समाजाचे प्रश्न सुटतील, लोकशाहीत सर्वांना अधिकार आहे.