पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाने राज्यातील वेगवेगळ्या 37 विधानसभा मतदारसंघातून 40 जणांची हकालपट्टी केली आहे. यामध्ये कार्यकर्ते आणि नेत्यांचा सहभाग आहे. यांनी आपल्या पक्षाची असणारी पक्ष शिस्त न पाळल्याबद्दल आणि पक्षातून हकालपट्टी केली आहे. असे परिपत्रक महाराष्ट्र कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी काढले आहे. अशी अधिकृत माहिती 'एएनआय' वृत्तसंस्थेने दिली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी पक्षासोबत बंडखोरी करणाऱ्या 40 जणांना नेत्यांना अखेर बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. पक्षाने सांगूनही उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने पक्षाकडून ही कारवाई केल्याचे बोलले जात आहे. या हाकालपट्टीमध्ये सावंतवाडीतून विशाल परब, श्रीगोंदामध्ये सुवर्णा पाचपुते, अक्कलकोटमधून सुनील बंडगर, अमरावतीतून जगदीश गुप्ता, साकोली मतदारसंघातून सोमदत्त करंजकर यांच्यासह एकूण 40 जणांवर पक्षाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच भाजपचे महाराष्ट्र प्रदेश प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे यांनीही बंडखोरी करणाऱ्यांवर पक्षातून 6 वर्षासाठी निलंबित करणार असल्याचे सांगितले होते.