शिर्डी : पुढारी वृत्तसेवा : शिवसेना सोडून जाणार्याबद्दल माझ्या मनात राग, द्वेश नाही, उद्धव ठाकरे व शिवसैनिकांच्या पाठीत खंजीर खुपसला याचे दुःख आहे. मात्र, आपल्याला थोडी लाज असेल, तर आमदारकी व खासदारकीचा राजीनामा द्या आणि मध्यवर्ती निवडणुकीला सामोरे जा. मग जनता ठरवेल त्यांना कोणता नेता पाहिजे. ते आम्ही मान्य करू, असे खुले आवाहन माजी मंत्री तथा शिवसेना युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केले.
शिवसंवाद यात्रेदरम्यान शिर्डी येथे आले असता ठाकरे बोलत होते. याप्रसंगी संपर्कप्रमुख सुनील शिंदे, माजी मंत्री बबनराव घोलप, साई संस्थांनचे उपाध्यक्ष अॅड. जगदीश सावंत, विश्वस्त सचिन कोते, राहुल कनाल, प्रमुख उद्धव कुमठेकर, जिल्हाप्रमुख रावसाहेव खेवरे, तालुकाध्यक्ष संजय शिंदे, युवासेना दिनेश शिंदे, कमलाकर कोते, राजेंद्र पठारे, शहर संघटक अमोल गायके, लोकसभा संपर्क सुहासराव वाहडणे, सुयोग सावकारे, उपजिल्हा प्रमुख अनिल बांगरे, नाना बावके, विजय जगताप, मुकुंद सिनकर, बाळासाहेब जाधव, जयंतराव पवार, आदींसह महिला शिवसैनिक उपस्थित होत्या.
ठाकरे म्हणाले की, 40 गद्दार का सोडून गेले, त्यांनी आपल्या पाठीत खंजीर खुपसला. बेकायदेशीरपणे, घटनाबाह्य सरकार बनवलं हे सरकार लवकरच कोसळणार आहे. बेईमानी व गद्दारी फार दिवस चालत नाही. या लोकांना शिवसेनेनं काय कमी केलं. विधान भवनातील नाट्य बघून माझे मन खात होते. त्यांना शिवसेनेने मंत्री बनवले, पदे दिली. त्यांना जे काही दिल कदाचित जास्तच दिले. त्यामुळे त्यांना अपचन झाल असेल.
उद्धव ठाकरेंच्या आजारपणाच्या कठीण काळात साथ सोडायला नव्हती पाहिजे. त्यावेळी त्यांनी अस म्हटलं पाहिजे होते की, मी तुमच्यासाठी बाहेर पडतो. हे अपेक्षित होत. आज साईबाबांच्या शालीने माझा सत्कार झाला. ती शाल माझ्या अंगावर आहे, मी खोटे बोलणार नाही. उद्धव ठाकरे दिवाळीनंतर आजारपणात भेटू शकले नाही, पण मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून ते काम करीत होते. त्यावेळी माझ्या बरोबर किती लोक आहेत, ते पहात होते. राग मनात नाही पण ज्यांच्यासाठी आपण सगळं काही केलं, त्यांनी मात्र पाठीत खंजीर खुपसला.
ठाकरे म्हणाले, सर्वत्र पावसाने थैमान मांडले आहे. अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन लोकांचे असणारे मंत्री मंडळ कुठे आहे? असा सवाल केला. आता शिर्डी लोकसभेत भगवा फडकवा गेल्या लोकसभा निवडणुकीत आपले उमेदवार लोकांना दिसत नव्हते. तेव्हा गेल्या निवडणुकीच्या प्रचारासाठी मी इथे तीन-चार सभा घेतल्या आणि या जनतेची माफी मागितली. आता पुन्हा या लोकसभा मतदार संघात भगवा फडकवा, असे आवाहन शिवसैनिकांना आदित्य ठाकरे यांनी केले आहे.