नगर : पुढारी वृत्तसेवा : जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात, तसेच देशभक्तीची जाज्वल्य भावना कायम स्वरूपी जनमाणसात रहावी. या उद्देशाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव राज्यभरात राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून 11 ते 17 ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 9 लाख 39 हजार 481 घरांवर भारताचा राष्ट्रीय ध्वज तिरंगा फडकाविण्याचे नियोजित असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारच्या निर्देशानुसार विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, तहसीलदार वैशाली आव्हाड हे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले की, हर घर तिरंगा या उपक्रमात लोकसहभाग महत्वाचा आहे. या उपक्रमासाठी जिल्ह्यातील मोठ्या पुरवठादारांकडून आणि बचत गटाच्या माध्यमातून तिरंगा ध्वज बनवून घेण्यात येणार असून, विक्रीसाठी गावागावांत उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत सांस्कृतिक कार्यक्रम, निबंध स्पर्धा, प्रदर्शन, मॅरेथॉन, प्रभात फेरी आदी कार्यक्रम आयोजित केले जाणार जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी सांगितले.
75 फूट उंचीचा राष्ट्रध्वज फडकणार
येत्या 15 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयातून तिरंगा बलुन सोडण्यात येणार आहे. याच दिवशी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच प्रत्येक तहसील कार्यालयात 75 फूट उंचीचा राष्ट्रध्वज उभारण्यात येणार आहे. याशिवाय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवाचे बोधचिन्ह व संविधान स्तंभ जिल्हाधिकारी कार्यालयात उभारण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 9 हुतात्मा स्मारकांची डागडुजी, देखभाल व दुरूस्ती करून त्यांचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे.
झेडपी पुरवणार 75 हजार ध्वज
नियमानुसार ध्वज 30 इंच बाय 20 इंच आकाराचा किंवा लांबी रुंदीचे प्रमाण 3:2 आयताकार तसेच कापडी असावा. ध्वजाची किंमत 30 रुपये आहे. जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचारी यांच्या वर्गणीतून 75 हजार ध्वज, ग्रामीण भागातील जनतेला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे सीईओ आशिष येरेकर यांनी केले.