संगमनेर शहर : पुढारी वृत्तसेवा : संगमनेर एस. टी. आगाराच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त खास पंढरपूरला जाण्यासाठी (दि. 6 ते 11 जुलै) या कालावधीत 22 एस. टी. बसेस सोडण्यात येणार आहेत. दरम्यान, पंढरपूरला जाण्यासाठी गावातून 45 प्रवासी झाल्यास स्वतंत्र बस सोडणार असल्याचे संगमनेर आगाराचे प्रभारी व्यवस्थापक नीलेश करंजेकर म्हणाले.
दोन वर्षांपासून कोरोना महामारी संकटामुळे आषाढ वारी बंद होती, परंतु कोरोनाचे सावट कमी झाल्यामुळे यावर्षी आषाढी एकादशीला विठ्ठल- रुख्मिणी मातेच्या दर्शनासाठी संगमनेर तालुक्यातुन असंख्य भाविक पंढरपूरला जाणार आहेत. संगमनेर आगाराच्या वतीने (दि. 6 ते 11 जुलै) पर्यंत एस. टी. बसेस सोडण्यात येणार आहेत.
संगमनेर ते पंढरपूर एका व्यक्तीसाठी 445 रुपये, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांसाठी 225 रुपये भाडे आहे. प्रवाशांची गर्दी वाढल्यास पंढरपूरसाठी जादा बसेस सोडणार आहे. संगमनेर आगारामधून दररोज सकाळी 8 व दुपारी 4 वाजता बसेस पंढरपूरसाठी सोडणार आहे. गावांमधून 45 प्रवासी उपलब्ध होतील, तेथून स्वतंत्र एस. टी. बस सोडणार आहे. सरपंचांनी संगमनेर आगार व्यवस्थापकांशी संपर्क साधावा, असे आवाहन संगमनेर आगाराचे वाहतूक निरीक्षक योगेश दिघे, सहाय्यक वाहतूक निरीक्षक जयदीप काशीद व वाहतूक नियंत्रक बापूसाहेब भुसारी यांनी केले आहे.