नेवासा, पुढारी वृत्तसेवा : नेवासा तालुक्यात होत असलेल्या भीज पावसाने बळीराजा सुखावला असला, तरी शेतीची कामे मात्र खोळंबली आहेत. पिकांपेक्षा तणगवतच मोठ्या प्रमाण वाढले आहेत. अनेक ठिकाणी कपाशी खुरपणीला आली असून, पावसामुळे यालाही विलंब होत आहे.
नेवासा तालुक्यात पेरणीसाठी दमदार पाऊस झाल्याने खरिप हंगामातील पेरण्यांना वेग आला होता. 70 ते 75 टक्के पेरण्या झालेल्या असून, अनेक ठिकाणी कपाशी खुरपणी, खोडवा उसाला माती लावणे, खते घालणे, तर काही पेरण्या सुरूच आहेत. शेतीपिकातील मशागतीच्या कामांना गती येईल, असे वाटत असतानाच गेल्या सात ते आठ दिवसांपासून नेवासा तालुक्यात कमी अधिक फरकाने पाऊस पडत आहे. पावसाची कधी रिपरिप, तर कधी जोरदार सरी येत असल्याने कपाशी, मका, सोयाबीन, तूर, बाजरी आदी पिकांमध्ये तणगवताचे प्रमाण वाढले आहे. भीज पावसाने पाणी पातळी वाढते; परंतु जमिनीतील वाफसा होत नसल्याने शेतीच्या पिकांमधील अंतर्गत कामे खोळंबली आहेत. हा पाऊस पिकांना चांगला आहे; मात्र खुरपणी झालेल्या पिकांना पुन्हा एकदा खुरपणी करावी लागणार आहे. याचा आर्थिक भार शेतकर्यांवर पडणार आहे.
सततच्या पावसाने पिकांमधील मशागतीची कामे छोट्या ट्रॅक्टरने होत असल्याने त्यांनाही पर्यायी आर्थिक फटका बसत आहे. जमिनीत सतत ओल असल्याने रासायनिक खते व उसाला माती लावणे, तर काहींची पेरणीच कामे भीज पावसाने रखडली आहेत. पावसाने शेतकर्यांमध्ये समाधानाचे वातावरण असले, तरी शेतीअंतर्गत कामे मात्र खोळंबली आहेत.
सध्या दमदार पाऊस नसल्याने व भीज पावसाने शहरात सर्वत्र दलदल निर्माण झालेली आहे. शहरातील वडार गल्ली, सदाशिवनगर, विवेकानंद वसाहत आदी भागात चालणे जिकिरीचे झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.