अहमदनगर

नगर : विजेचा धक्का बसून शेतकर्‍याचा मृत्यू

अमृता चौगुले

वाळकी : पुढारी वृत्तसेवा : शेतात बोअरवेल चालू करण्यासाठी गेलेल्या तरुण शेतकर्‍याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नगर तालुक्यातील कामरगाव शिवारात शुक्रवारी (दि.1) सायंकाळी घडली. शिवाजी गंगाधर ठोकळ (वय 35, रा.कामरगाव, ता.नगर) असे या मृत शेतकर्‍याचे नाव आहे.

ठोकळ शुक्रवारी सायंकाळी कामरगाव शिवारातील शेतात बोअरवेल चालू करण्यासाठी गेले होते. बोअरवेल चालू होत नसल्याने स्टार्टर बॉक्समध्ये पाहणी करत असताना, विद्युत प्रवाह असलेल्या केबलचा त्यांच्या छातीला स्पर्श होऊन शॉक बसला. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. नागरिकांनी त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले.

मात्र, उपचार सुरू करण्यापूर्वीच डॉक्टरांनी ठोकळ यांना मृत घोषित केले. शनिवारी (दि.2) सकाळी जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मयत ठोकळ यांच्या पश्चात वडील, पत्नी, 1 मुलगा, 1 मुलगी, 2 भाऊ असा परिवार आहे. या प्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

SCROLL FOR NEXT