लोणी, पुढारी वृत्तसेवा : पावसाळयात उगवणाऱ्या रान गवतामुळे विषबाधा होऊन जनावरे दगावण्याच्या घटना घडतात. त्यामुळे शेतकर्यांनी पावसाळयात येणारी रान गवते काठेमाट, राजगिरा, घानेरी, तीनपाणी, कन्हेर, सुबाभूळ, एरंड, बेशरम अशा गवतांपासून जनावरांना दूर ठेवावे, असे कृषी विज्ञान केंद्र, बाभळेश्वर यांचेकडून सांगण्यात आले आहे.
कृषी विज्ञान केंद्र, बाभळेश्वर आणि पंचायत समिती, राहाता यांचे संयुक्त विद्यमाने केलवड येथे याबाबत केलवड गावामध्ये किशोर घोरपडे यांच्या गाई दगावल्यामूळे शेतकर्यांसाठी जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कृषी विज्ञान केंद्राचे पशुविज्ञान विभागप्रमुख डॉ. विठ्ठल विखे, पंचायत समिती राहाता येथील डॉ. शैलेश बन, डॉ. प्रवीण नेहारकर, डॉ. विकास गमे, डॉ. शरद गमे, डॉ. नितीन शेळके, सरपंच दीपक कांदळकर, सदस्य रामनाथ गमे आदी मान्यवर उपस्थित होते.
शेती व्यवसायामध्ये रासायनिक खतांचा वापर वाढलेला आहे. यामध्ये नत्रवर्गीय खतांचा वापर प्रमाणापेक्षा जास्त झाल्यामूळे पिकातील क्षारांचे प्रमाण वाढलेले आहे, तसेच झुडपांमध्ये उदा. धोत्रा, केना, राजगिरा यामध्ये ढगाळ हवामान आणि कमी पाऊस यामुळे क्षार साठविण्याची क्षमता जास्त असते. अशी प्रकारचे गवत जनावरांच्या पोटामध्ये गेल्यानंतर विषबाधा होते.