अहमदनगर

नगर : रहिमपुरात बोकड ओढत बिबटे पसार

अमृता चौगुले

संगमनेर विशेष, पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यातील रहिमपूरसह परिसरात बिबट्यांचा पुन्हा उपद्रव सुरूच झाल्याचे चित्र समोर आले आहे. दोन बिबट्यांनी मंगळवारी मध्यरात्री गावातील भर वस्तीतील एका शेतकर्‍याच्या गोठ्यात प्रवेश करून एक शेळी जागीची ठार केली, तर बोकड फरफटत नेल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले.

रहिमपूर भरवस्तीत रहिमपूर सोसायटी व प्राथमिक शाळेमागे राहणारे अण्णासाहेब चांगदेव शिंदे यांच्या घरासमोर गोठ्यात तीन शेळ्या व एक बोकड बांधला होता. या गोठ्यात अण्णासाहेब शिंदे स्वतः झोपले होते. मंगळवारी मध्यरात्री दोन बिबट्यांनी शिंदे यांच्या गोठ्यात प्रवेश केला. एका बिबट्याने शेळीच्या नरडीला पकडले, तर दुसर्‍या बिबट्याने शेळीजवळील बोकडाला पकडले.

दोन बिबट्याच्या या हल्ल्याने गोठ्यातील जनावरांनी ओरडा केल्याने अण्णासाहेब शिंदे व बंधू संतोष शिंदे जागे झाले. त्यांनी धाडसाने गोठ्यातील दोन बिबट्यांना हुसकावले. यावेळी एक शेळी जागेवर गतप्राण झाली, तर एक बोकडाला बिबट्यांनी फरफटत गोठ्याच्या पूर्वेला उसात धूम ठोकली. रहिमपूर आणि परिसरात पुन्हा बिबट्यांचा उपद्रव सुरू झाल्याने परिसरातील जनतेत घबराट निर्माण झाली आहे. बिबट्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

गावात दहशतीचे वातावरण..!

रहिमपुरसह परिसरात यापूर्वी शेतकर्‍यांच्या पशुधनांचे मोठे नुकसान बिबट्यांनी केले आहे. यापूर्वी बिबटे मळ्यात व वस्तीवरील गोधनावर हल्ले करत होते. मात्र, कालचा हा हल्ला दोन बिबट्यांनी गावातील भर वस्तीतील गोठ्यात येऊन केल्याने रहिमपुरात दहशत निर्माण झाली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT