नगर, पुढारी वृत्तसेवा : मतदार ओळखपत्र 1 ऑगस्टपासून आधारकार्डशी जोडण्यात येणार आहे. एकाच मतदाराचे दुसरीकडे नाव असल्यास ते शोधणे सोपे होणार असून, दुबार मतदार वगळण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यातील 35 लाख 28 हजार 542 मतदार ओळखपत्राला आधार जोडणी होणार आहे. त्यासाठी निवडणूक यंत्रणेचे मतदार केंद्रनिहाय नियोजन सुरू आहे.
प्रत्येकाच्या मतदान ओळखपत्राला आधार कार्ड जोडले जाणार आहे. त्यामुळे विधानसभा, लोकसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील बोगस मतदानाला आळा बसणार आहे. 1 ऑगस्टपासून या मोहिमेस प्रारंभ होणार आहे.
जिल्ह्यात 3 मार्च 2022 रोजी एकूण 35 लाख 28 हजार 542 मतदारसंख्या आहे. यामध्ये 18 लाख 35 हजार578 पुरुष, 16 लाख 92 हजार 810 महिला, 154 इतर मतदारांचा समावेश आहे. शंभर टक्के मतदार ओळखपत्राशी आधार लिंक केले जाणार असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील यांनी सांगितले.
अकोले 253822, संगमनेर 273474, शिर्डी 266942, कोपरगाव 266693, श्रीरामपूर 294034, नेवासा 267918, शेवगाव-पाथर्डी 348562, राहुरी 297641, पारनेर 328606, अहमदनगर शहर 289035, श्रीगोंदा 313244, कर्जत-जामखेड 328571.
आधार जोडणी ऐच्छिक असली तरी, मतदार यादी अधिक पारदर्शक व्हावी, यासाठी सर्वच मतदारांनी पुढाकार घेऊन आधार लिंक करुन घ्यावे, असे आवाहन तहसीलदार उमेश पाटील यांनी केले. त्यासाठी जुन्या मतदारांना 6 ब, तर नव्या मतदारांना क्रमांक 6 चा अर्ज भरावा लागणार आहे. हे अर्ज ऑनलाईन व ऑफ लाईन अशा दोन्ही प्रकारे भरता येणार आहेत.