संगमनेर शहर, पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यातील आश्वी येथील प्रवरानदीवरील बांधण्यात आलेल्या कोल्हापूर बंधार्यात पाणी अडवण्यासाठी उपयोगात येणार्या 48 लोखंडी फळ्या अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची तक्रार आश्वी पोलिस ठाण्यात दाखल झाल्यानंतर अवघ्या 48 तासात पोलिसांनी मद्देमालासह या गुन्ह्यातील दोघांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत आश्वी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत रखवालदार आकाश लहानू बर्डे यांनी तक्रार दिली होती. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक सुभाष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार डी. डी. बर्डे करत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दोघे जण चोरलेल्या मालासह अकोले नाका येथे असून चोरीचा मालही गाडीत आहे. यावेळी पोलिस निरीक्षक सुभाष भोये यांनी पोलिस उपअधीक्षक राहुल मदने याबाबत माहिती दिली.
माहिती मिळताच त्यांनी योग्य त्या सूचना करताच सहाय्यक फौजदार डी. डी. बर्डे, गोपनीय विभागाचे विनोद गंभिरे, हवालदार रवीद्रं वाकचौरे, हुसेन शेख, शांताराम झोडंगे, तसेच होमगार्ड बुरकुल, मगर व नागरे याच्यां पथकाने मोठ्या शिताफीने मोसीनखान रहीमखान पठान (वय – 35, रा. अकोलेनाका, संगमनेर) व आवेश नासीर अत्तार (वय 20, रा. जोशी चाळ, देवळाली गाव, नाशिक) या दोघाना 2 लाख 50 हजार रुपये किमतीच्या वाहन, तसेच 11 हजार 200 रुपये किमतीच्या 4 लोखंडी फळ्यासह ताब्यात घेतले.
दरम्यान पोलिसांनी आरोपीकडे कसून चौकशी केली असता हा मुद्देमाल आश्वी येथून चोरुन आणल्याची कबुली त्यांनी दिली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक सुभाष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. आश्वी पोलिसांनी अवघ्या 48 तासात मद्देमालासह दोन आरोपींना ताब्यात घेतल्याने परिसरातील इतर गुन्ह्याची उकल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बंधार्याच्या फळ्या चोरणारी टोळी या भागात कार्यरत झाल्याची दाट शक्यता या परिसरातील शेतकर्यांनी व्यक्त केली आहे.