वाळकी, पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील अकोळनेर येथील महावितरणच्या वीज उपकेंद्रातील पॉवर ट्रान्सफार्मर दोन महिन्यांपूर्वी जळाला आहे. तो अजूनही दुरुस्त केलेला नाही. यामुळे या उपकेंद्रातून वीज पुरवठा होणारी पाच गावे दोन महिन्यापासून अंधारात आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण असून, येत्या दोन-तीन दिवसांत नवीन ट्रान्सफार्मर बसवून वीज पुरवठा सुरळीत न केल्यास उपकेंद्राला टाळे ठोकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
अकोळनेरच्या उपकेंद्रातील पॉवर ट्रान्सफार्मर दोन महिन्यांपूर्वी जळाल्याने या उपकेंद्रातून वीज पुरवठा होणारी अकोळनेर, भोरवाडी, जाधववाडी, सारोळा कासार, घोसपुरी गावातील थ्री फेजचा वीज पुरवठा विस्कळीत झालेला आहे. या गावांना कधी केडगाव, तर कधी भोयरे पठार, कधी बाबुर्डी बेंद उपकेंद्रातून वीज पुरवठा करण्यात येतो. मात्र, या गावांना वीज जोडल्यानंतर त्या उपकेंद्रांवर विजेचा अधिकचा भार पडत असल्याने सातत्याने वीज पुरवठा खंडित होतो. या गावांना कधीकधी दिवसभरात 15 ते 20 मिनिटेही वीज पुरवठा होत नाही. त्यामुळे शेतात वाड्या-वस्त्यांवर राहणार्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे.
याच चार-पाच गावांच्या पसिरात गेल्या दोन महिन्यांपासून रात्री वीज नसल्यामुळे अंधाराचे साम्राज्य असते. त्यामुळे शेतकर्यांच्या गोठ्यातील पाळीव जनावरांच्या चोर्यांचे प्रमाणही वाढले आहे. वीज पुरवठा नसल्याने शेतातील पिकांना पाणी देता येत नाही. जनावरांच्या चार्यासाठी कडबा कुट्टी मशिनही सुरू करता येत नाही. गावातील थ्री फेजवर चालणार्या पिठाची गिरणी, तसेच अन्य व्यवसायही ठप्प झाले आहेत.
गेल्या दोन महिन्यांपासून या गावातील ग्रामस्थांना विजेअभावी मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. वीज उपकेंद्रावर मोर्चा काढून आंदोलन करण्याचा निर्णय परिसरातील गावांनी घेतला आहे. या संदर्भात अकोळनेरचे सरपंच प्रतीक शेळके, घोसपुरीचे माजी सरपंच राजेंद्र खोबरे, भोरवाडीचे सरपंच भास्कर भोर, प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष नानासाहेब पारधे, निवृत्ती कॅप्टन सुभाष ठोकळ, प्रा. योगेश घोडके, शेखर घोडके, अजित घोडके, दादा गायकवाड पदाधिकार्यांनी विद्युत अभियंता संदीप भराट यांची बुधवारी (दि.24) भेट घेऊन निवेदन दिले. त्यानंतर महावितरणच्या शहर तथा ग्रामीण विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांशी मोबाईलवर चर्चा केली.
कार्यकारी अभियंत्यांनी येत्या तीन दिवसांत पॉवर ट्रान्सफार्मर बसवून वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले, तीन दिवसांत वीज पुरवठा सुरळीत झाला नाही, तर अकोळनेरच्या वीज उपकेंद्राला टाळे ठोकण्यात येईल व रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.