नेवासा : पुढारी वृत्तसेवा: नेवासा नगरपंचायतची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे. अखेरची सर्वसाधारण सभा नगर पंचायत कार्यालयात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेसमोरील सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली. नेवासा नगरपंचायतची स्थापना होऊन येत्या 18 तारखेला पाच वर्षे पूर्ण होत असल्याने, ही शेवटची सर्वसाधारण सभा होती.
सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा योगिता पिंपळे होत्या. प्रारंभी मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांनी अहवाल वाचन केले. कोरम पूर्ण झाल्यानंतर दुपारी 12 वाजता सभा सुरु झाली.सभेच्या अजेंड्यावरील सर्व विषय अनुक्रमांकाप्रमाणे घेऊन त्यावर सविस्तर चर्चा झाली. सर्व विषयांना यावेळी मंजुरी देण्यात आली.
नगराध्यक्षा पिंपळे, उपनगराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी उपस्थित सर्व नगरसेवक, नगरसेविका व मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांच्यासह अधिकारी रवींद्रकुमार गुप्ता, भाऊसाहेब म्हसे, रामदास म्हस्के, निखिल नवले, प्रवीण कदम, राजेश्वर सोनवणे, ताराचंद चव्हाण, सुधाकर चांदणे, सुधीर चित्ते, राजेंद्र चव्हाण, बंडू चक्रनारायण, प्रताप कडपे, मनिषा मापारी, विलास आरले, अरूण चित्ते आदींचा सत्कार केला.
संदीप बेहेळे, नंदकुमार पाटील, सीमाताई मापारी, निर्मला सांगळे या नगरसेवकांनी आपल्या मनोगतात मागील पाच वर्षांचा आढावा घेताना, पूर्ण झालेली कामे तसेच पुढील पाच वर्षांत याही पेक्षा चांगली कामे होऊन गावगाडा चांगल्या पद्धतीने चालविण्यासाठी सर्वांनी एकमेकास सहकार्य करून नेवासा शहराची प्रगतीकडे वाटचाल होत असल्याचे सांगितले.
सर्व नगरसेवक व अधिकारी, कर्मचार्यांनी कसोसीने प्रयत्न करून चांगली कामे केली व प्रशासनास सहकार्य केल्याचे मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांनी सांगितले. कार्यालय कक्ष अधिकारी रवींद्र गुप्ता यांनी उपस्थितांचे आभार मानले.