बोधेगाव, पुढारी वृत्तसेवा : शेवगाव तालुक्यातील नागलवाडी येथील शेतकरी वसंत बाबुराव ढाकणे यांच्या जनावरांच्या गोठ्यातून 29 जुलैच्या रात्री बैल, गाय आणि कालवड यांची चोरी झाली आहे. याबाबत त्यांनी शेवगाव पोलिसात अर्ज दाखल करून तक्रार केली आहे.
वसंत ढाकणे यांना तीन बैल, गाय आणि कालवड, अशी जनावरे आहेत. चोरीच्या रात्री या सर्व जनावरांना वैरण घालून जनावरांच्या गोठ्यात ते झोपले. नेहमीप्रमाणे पहाटे चारच्या दरम्यान जनावरांना चारा टाकण्यासाठी उठले असता त्यांना जनावरे कमी झाल्याचे दिसले. त्यांनी जनावरे मोजली असता एक बैल, गाय आणि कालवडची चोरी झाल्याचे लक्षात आले.
या जनावरांच्या गळ्यातील गाठी काढून ठेवल्याचेही लक्षात आले. दरम्यान, संततधार पाऊस सुरू आहे. दिवसभर पावसाने उघडीप दिली; तरी रात्री हमखास पाऊस हजेरी लावतो. त्यामुळे अनेक शेतकरी दिवस मावळतीला धारा काढून जनावरांना चारा पाणी करून गोठ्याचे दार बंद करून घरी येतात. गावकुसालगत असणार्या गोठ्यात म्हतारी माणसे जनावरांच्या गोठ्यात झोपतात; परंतु चोरीच्या घटनेने शेतकरी धास्तावले आहेत.