अहमदनगर

नगर : दारुबंदीमुळे मद्यपींचा शेजारील गावांकडे मोर्चा!

अमृता चौगुले

जवळा : पुढारी वृत्तसेवा : निघोज तालुका पारनेर येथे दारुबंदी झाल्याने काही मद्यशौकीन सैरभर झाले असून, त्यांच्यामध्ये नाराजी पसरली आहे. हॉटेल, बार, धाबा, परमिट रूममध्ये निवांत बसून दारू रीचवण्याची सवय लागलेल्यांनी शेजारील गावचा आश्रय घेतला आहे. त्यांनी आपला मोर्चा जवळ्याकडे वळवल्याचे बोलंले जात आहे. त्यामुळे सध्या जवळ्यातील हॉटेल व ढाब्यांवर दुपटीने गर्दी वाढली आहे.

गर्दी वाढल्याने एका ढाब्यावर, तर दोन गावांतील गटांमध्ये दारू पिण्याच्या हद्दीवरून चक्क जोरदार भांडण झाले आहे.
हा वाद विकोपाला जाणार तेवढ्यात त्यातील एका मद्यपीने दोन्ही गटांची समजूत काढत वाद मिटवण्यात यश मिळवले. यामुळे पुढील अनर्थ टळला.

भांडणाचे नेमके कारण

"तुम्ही आमच्या गावात दारू प्यायला येऊ नका, नाही, तर आमची पण बंद होईल," असे जवळेकरांचे म्हणणे होते, 'तर तुम्ही कोण आम्हाला सांगणार?,' असे निघोजकरांचे म्हणणे होते.

निघोज येथे उच्च न्यायालयानंतर राज्य शासनाने ही दारुबंदी लागू केल्याने येथील सात परवानाधारक दारू दुकाने बंद झाली आहेत. तेथे किमान दररोज पाच लाख रुपयांची दारू विकली जात होती, अशी माहिती आहे. या शिवाय बेकायदेशीर विक्री वेगळीच होती. येथे दारुबंदी लागू केल्यामुळे बेकायदेशीर विक्री रोखण्यासाठी एक समिती पारनेर पोलिस निरीक्षकांनी स्थापन केली आहे. पारनेर पोलिस येथील दारू विक्री बंद करण्यासाठी महिलांना मदत करत आहेत.

येथील एका हॉटेलवर निघोज पोलिसांसह दारुबंदी समितीने छापा टाकला. तिथे एका हॉटेलवर मालक दारू विक्री करताना आढळला, तर महिला व पथकाला पाहताच मद्यपींनी मागच्या दाराने पळ काढला. त्या दारुविक्रेत्या हॉटेल मालकाला नंतर बाटल्या हातात धरून पोलिस ठाण्यात चालत आणले. तिथे पंचनामा करून बेकायदेशीर दारुविक्रीचा गुन्हा दाखल केला.

SCROLL FOR NEXT