नगर : पुढारी वृत्तसेवा: जिल्हा परिषदेत अनेक पदे रिक्त असल्याने त्याचा प्रशासकीय कामांवर परिणाम होऊ नये, यासाठी कंत्राटी कर्मचार्यांच्या नियुक्ता केल्या जात आहेत. पाणी पुरवठा, ल.पा. बांधकाम, आरोग्य, ग्रामपंचायत अशा विविध विभागात कंत्राटी कर्मचार्यांच्या नेमणूक आहेत. संबंधितापैकी अनेक कर्मचार्यांना कोणताही अनुभव नाही, तसेच त्यांच्यावर कोणती कायदेशीर 'जबाबदारी'ही निश्चित करता येत नसल्याने त्याचा परिणाम थेट कामावर दिसून येतो आहे.
जिल्हा परिषदेत सीईओ आशिष येरेकर, अतिरिक्त सीईओ संभाजी लांगोरे यांनी प्रशासनाला शिस्त लावली आहे. मात्र, दिवसेंदिवस अनेक विभागात कंत्राटी कर्मचार्यांची भरती केली जात असल्याने त्यांच्यावरील नियंत्रणही आता चर्चेचा विषय ठरला आहे. संबंधित कर्मचारी हे करार पद्धतीने सेवेत आहेत. एकतर त्यांना अनुभव नाही, त्यामुळे काम शिकवताना विभागप्रमुखांची डोकेदुखी वाढते. शिवाय, कर्मचार्यांनी चुकीचे काम केले तर त्यांच्यावर कायदेशीर जबाबदारीही निश्चित करता येत नाही.
त्यामुळे कंत्राटी कर्मचारी हे सुरुवातीला तरी अपेक्षित काम करत नाही. याउलट काही कंत्राटी कर्मचारी खरोखरच चांगल्याप्रकारे काम करत असल्याचेही पहायला मिळते. सध्या ग्रामपंचायत विभाग 9, आरोग्य विभाग 16, ग्रामीण पाणी पुरवठा 3, शिक्षण 8, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना 5, पाणी व स्वच्छता 10, जि.ग्रा.वि.वं 7 , तसेच पाणी पुरवठा विभागाचे प्रत्येक तालुकास्तरावर 3 असे 42 शाखा, कनिष्ठ अभियंता व इतर, याशिवाय राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे 4 हजार अशी कर्मचारी ही कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत. यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे काम कमी अधिक प्रमाणात का होईना, पण समाधानकारक दिसते.
मात्र अभियंता संवर्गातील पदे मात्र कंत्राटी पद्धतीने भरली गेल्याने काही कर्मचार्यांना ना अनुभव आहे, ना जबाबदारीची जाणीव, त्यामुळे या कर्मचार्यांना काम समजावताना विभागप्रमुखांच्याही नाकी नऊ येत आहेत. याशिवाय काही चुका झाल्यास त्याचे खापर विभागप्रमुखांच्या माथ्यावर मारले जात असल्याने काम करावे तरी अडचण आणि काम करताना चुकले तरी अडचण, अशी अवस्था अनेक विभागात निर्माण झाली आहे. त्यामुळे कायमस्वरुपी आणि अनुभवी मनुष्यबळ निर्मिती गरजेची आहे.
'जलजीवन'ला मनुष्यबळाचे टॉनिक हवे
जलजीवन योजना ही केंद्र आणि राज्याची महत्वाकांक्षी योजना आहे. मात्र, या विभागातही अपुरे मनुष्यबळ आहे. सीईओ आशिष येरेकर यांनी बांधकाम दक्षिण आणि उत्तर विभागातील काही अनुभवी कर्मचार्यांना आठवड्यातून तीन दिवस 'पाणीपुरवठ्या'त नियुक्ती दिली आहे. कार्यकारी अभियंता आनंद रुपनर हे या कर्मचार्यांकरवी जलजीवनला गती देणार असले, तरी या विभागाला कायमस्वरुपीच्या अनुभवी मनुष्यबळाचे टॉनिक देणे तितकेच गरजेचे आहे.
राष्ट्रीय आरोग्य विभागाची दोर कंत्राटीच्या हाती!
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक 1, लेखा व्यवस्थापक 1, उपअभियंता 1, कनिष्ठ अभियंता 3, सहायक लेखापाल 2, जिल्हा सनियंण अधिकारी 1, सांख्यिकी अन्वेषक 3, कार्यक्रम समन्वयक 5, आयपीएचएस प्रयोगशाळा तंत्रज्ञ 5, आयपीएचएस विशेषतज्ज्ञ 20, आयपीएचएस स्टाफ नर्स 10, एनबीएसयू नर्स 15, एसएनसीयू स्टाफ नर्स20, समुदाय अधिकारी 488, एएनएम 174, आरसीएच एएनएम 12, जीएनएम 19, एलएचव्ही 46, तालुका लेखापाल 13, तालुका समुह संघटक 14, गटप्रवर्तक 172, आशा स्वयंसेविका 3181, आरबीएसके वैद्यकीय अधिकारी 90, आरबीएसके एएनएम 59, औषधनिर्माता 58, आयुष वैद्यकीय अधिकारी 12 कर्मचारी आहेत. यातील काही विभागांत अतिशय चांगल्याप्रकारे काम सुरू आहे.