नगर, पुढारी वृत्तसेवा : खरीप हंगामासाठी जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 330 कोटी 38 लाख रुपयांचे कर्ज वाटप झाले आहे. 3 लाख 15 हजार 914 शेतकर्यांनी पीक कर्जाचा लाभ घेतला आहे. उदिृष्टाच्या 56 टक्के कर्जवाटप जिल्ह्यात झाले आहे. एकट्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 2 हजार 100 कोटींचे कर्ज वाटप केले तर उर्वरित 230 कोटी इतर बँकांनी वाटप केले.
खरीप हंगामात कापूस, सोयाबीन, भुईमूग, तीळ, बाजरी, हरबरा, तूर, मूग, उडिद, भात तसेच खरीप ज्वारी आदी पिके खरीप हंगामात घेतली जात आहेत. हा जिल्हा खर्या अर्थाने रब्बी पिकांसाठी ओळखला जात आहे. जिल्ह्यातील एकूण महसुली गावांपैकी 580 गावांत खरीप हंगाम घेतला जात आहे. खरीप पिकांची पेरणी शंभर टक्के व्हावी तसेच पैशावाचून कोणत्याही शेतकर्यांची पेरणी रखडली जाऊ नयेत, यासाठी राज्य शासनाने राष्ट्रीयीकृत, व्यापारी तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना प्रत्येक वर्षी पीककर्ज पुरवठा करण्याचे उदिृष्ट दिले जाते.
आत्तापर्यंत जिल्ह्यातील 2 लाख 36 हजार 372 हेक्टर क्षेत्रासाठी 2 हजार 330 कोटी 38 लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. त्याचा लाभ 3 लाख 15 हजार 914 शेतकर्यांना झाला आहे. अद्यापि 1 हजार 800 कोटी रुपयांचे कर्जवाटप बाकी आहे. खरीप पिकांसाठी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून 101 टक्के पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे.
खरीप हंगामासाठी नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला 2 हजार 100 कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपांचे उदिृष्ट देण्यात आले आहे. बँकेने शंभर टक्के कर्जवाटप केले आहे. त्यातील 40 ते 45 टक्के कर्जपुरवठा एकट्या बाजरी पिकाला करण्यात आला आहे. सोयाबीन, कापूस, उडिद, मूग, हरबरा व इतर पिकांसाठी 20 ते 25 टक्के कर्जपुरवठा करण्यात आला आहे. 2022-23 या वर्षासाठी नगर जिल्ह्याला खरीप पिकांसाठी एकूण 4 हजार 141 कोटी 52 लाख रुपयांचे कर्जवाटप करण्याचे उदिृष्ट राज्य शासनाने दिले आहे. यंदाच्या खरीप पिकांसाठी कृषी विभागाने सव्वापाच लाख हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले आहे. त्यानुसार आतापर्यंत जिल्ह्यात 4 लाख 29 हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी झाली आहे.