जवळा : पुढारी वृत्तसेवा : पारनेर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील कुकडी कालवा भागात सुरुवातीला बराच काळ दडी मारून बसलेल्या पावसाने रविवारी (दि.26)जोरदार सलामी दिली. या पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे.
मागील वर्षी वेळेवर पडलेला पाऊस या वेळी हुलकावणी देतो की काय, असे वाटत होते. तसेच, शेतकर्यावर दुबार पेरणीचे संकट येते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. नेमक्या त्याच वेळेस रविवारी दुपारी पावसाने जोरदार बॅटिंग करत हजेरी लावत शेतकर्यांवर कृपादृष्टी केली. दुबार पेरणीचे संकट टळल्याने शेतकरी समाधानी झाला आहे.
जवळा परिसरात रविवारी दुपारी झालेल्या पावसाने शेतमजूर व शेतकर्यांची काही काळ चांगलीच पळापळ केली परंतु, नंतर शांतपणे पाऊस पडल्याने शेतकर्यांना चांगलाच दिलासा मिळून फळबागा, कडधान्य, चारापिकेही तरारली आहेत.