अहमदनगर

नगर : जखणगाव येथील रस्ता कामाकडे नेत्यांचे दुर्लक्ष

अमृता चौगुले

टाकळी खातगाव, पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील जखणगाव येथील उंबराचा लिंबाचा मळा भिसे वस्तीकडे जाणार्‍या रस्त्याची अतिशय वाईट अवस्था झाली आहे. त्याचा मोठा त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. या भागातील सर्वच नेत्यांना याबाबत निवेदन देऊनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. या रस्त्याचा प्रश्न मार्गी न लागल्यास आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे.

जखणगाव येथील उंबराचा मळा लिंबाचा मळा या रस्त्यावरून पावसाळ्यात जाताना चांगलीच कसरत करावी लागत आहे. लहान मुलांना शाळेत जाताना तसेच शेतकर्‍यांना शेतीमाल दूध विक्री करण्यासाठी जाताना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. पाऊस झाल्यावर लहान मुलांना शाळेत पाठवता येत नाही. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

या भागात जवळपास 600 च्या वर मतदान आहे. तरीसुद्धा राजकीय नेतेमंडळी या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम मार्गी न लागल्यास आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा तात्यासाहेब कर्डिले, शिवाजी कर्डिले, रावसाहेब भिसे, भाऊसाहेब भिसे, बी. आर. कर्डिले, रावसाहेब कर्डिले, रामराव कर्डिले, अनिल कर्डिले, बाळासाहेब भिसे, किसन कर्डिले, सुभाष भिसे, गुलाब भिसे आदी ग्रामस्थांनी दिला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT