अहमदनगर

नगर : गोदावरी नदीवरील दोन्ही पुलांची दुरवस्था

अमृता चौगुले

कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा : शहरानजीक असलेल्या गोदावरी नदीवरील नगर-मनमाड महामार्गावरील पुलाचे ड्रेनेज होल साई सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मोकळे करून वाहते केले. हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाचे असताना हा विभाग पावसाळा आला, तरी झोपलेल्या अवस्थेत असल्याचे या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. या महत्त्वाच्या प्रश्नी सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांनी प्रधान सचिवांना खरमरीत पत्र धाडून या विभागाचे वाभाडे काढले आहेत.

काळे यांनी म्हटले आहे की, कोपरगाव शहराजवळील गोदावरी नमुना असलेला स्वातंत्र्य काळात घातलेला व स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येवर अस्तित्वात आलेला भव्य पूल आहे. आज पुलाचे चारही मनोरे कोसळले आहेत. पुलावर असंख्य खड्डे आहेत. अनेक ठिकाणी पुलाचेे कडे कोसळले आहेत. दर मोरीवर एक प्रशस्त पिंपळाचे झाड उगवले आहे. एक देखील ड्रेनेज होल उघडे नाही, असा पुलाचा प्रपंच रोज अडीच लाख टन सांभाळतो.

या पुलाची अवस्था पाहिल्यावर लक्षात येते की, आमचे अहमदनगर जिल्ह्याचे अभियंते किती कार्यक्षम आहेत. रस्ता दिला म्हणजे आमची जबाबदारी संपली. एवढी मोठी वाहतूक पेलत असताना अशा खड्ड्यांनी नटलेल्या पुलाचा दगड प्रत्येक वाहनाच्या गचक्याने आपले आयुष्य कमी करीत आहे. मोठ्या अपघाताची पूर्व सूचना देत आहे.

या पुलाशेजारी नवा पूल बांधला आहे. हा पूल चालू होण्याआधीच खंडर झाला आहे. त्याचे भरावे शास्त्रोक्त पद्घतीने नसल्याची तक्रार करून दोन वर्षे लोटली. मात्र, अद्याप कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही.
आजच्या वायुवेगाच्या काळात आपण बैलगाडीत प्रवास करणारी यंत्रणेचा वापर करीत आहात. भारताचे संरक्षण करा, कर्तव्याचे पालन करावे, असे पत्रात नमूद केले आहे.

SCROLL FOR NEXT