चिचोंडी शिराळ (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : दोन एकरावरील ऊस जळून खाक झाला असून, हातचे पीक गेल्याने बळीराजाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी मोठ्या कष्टाने आपल्या पिकांची काळजी घेत असतो. तो पिकांना जपतो, त्यात ऊस पिकाची काळजी घेताना पाणी देण्यासाठी होणारी तारांबळ सर्वांना माहिती आहे. ऊस पीक पाण्याशिवाय जगू शकत नाही. परंतु, ऊस पीक जगल्यानंतर शेतकर्यांच्या आयुष्यातील आर्थिक अडचणींचा भार कमी करते. मात्र, हाती आलेले पीक अपघाताने गमावाव लागल्याची दुर्दैवी घटना पाथर्डी तालुक्यातील धारवाडी येथे घडली.
धारवाडी शिवारातील दत्तू सखाराम गोरे यांचे जवळपास दोन एकरावरील उसाचे पीक शॉर्टसर्किटमुळे जळून खाक झाले. तसेच, संतोष भाऊराव गोरे व सुनील गोरे यांचे संत्रा बागेतील जवळपास 40 ते 50 झाडे जळाली. या दोन्ही घटना बुधवारी (दि.6) दुपारी घडल्या. यामध्ये शेतकर्यांचे जवळपास तीन लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गोरे कुटुंबीयांवर मोठी निराशा पसरली. या घटनेची माहिती मिळताच ग्रामसेविका मनीषा कंठाले, तलाठी संध्या शिरसाट, कृषी सहायक सचिन मुने यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
हे ही वाचा :