नगर : पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारच्या भारत स्वच्छ अभियान व राज्य सरकारच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या माझी वसुंधरा व सौंदर्यीकरण स्पर्धेमध्ये अहमदनगर महापालिकेने भाग घेतला आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती होत आहे. त्यामुळे आपले शहर स्वच्छ सुंदर राहण्यास मदत होते. झाडांच्या रंगरंगोटीमुळे शहराच्या सौदर्यींकरणात भर पडणार असल्याचा विश्वास मनपाचे उद्यान विभागप्रमुख शशिकांत नजान यांनी दिली.
नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या सौंदर्यीकरण स्पर्धेमध्ये अहमदनगर महापालिकेचा राज्यामध्ये तिसरा क्रमांक आला. आता नागरिकांमध्ये वृक्षाबाबतचे प्रेम अधिक घट्ट व्हावे, वृक्षाचे महत्त्व पटावे यासाठी शहरातील काही झाडांची रंगरंगोटी केली जात आहे. त्या माध्यमातून शहराच्या सौंदर्यीकरण व सुशोभीकरणामध्ये भर पडणार आहे. वृक्षाच्या माध्यमातून मानवाला मोफत ऑक्सिजन मिळत आहे. महापालिकेतर्फे आता शहरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लावून त्यांचे संवर्धन करण्यात येणार आहे अशी माहिती नजान यांनी दिली.