कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा : येथील गोदावरी नदीत साठलेल्या पाण्यात मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाल्याने हजारो मासे मृत पावले. नदीपात्रामध्ये मृत माशांचा अक्षरशःखच पडल्याचे दिसत आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. दरम्यान, ही बाब काही पर्यावरण प्रेमींच्या लक्षात आल्यामुळे कोपरगावकर आता भर उन्हाळ्यात चांगलेच तापले आहे. प्रदूषणावर नियंत्रण ठेवणारे प्रदूषण महामंडळ नेमके काय काम करते, असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य नागरिक करीत आहेत.
मासे नेमकं कशामुळे मेले, गोदावरीच्या साठलेल्या पाण्यात अक्षरशः गटार गंगेचे स्वरूप आले आहे. पाणी काळपट, हिरवे दिसत आहे. प्रदूषण रोखण्यात महामंडळ पूर्णतः अपयशी ठरले आहे. प्रदूषणाला जबाबदार घटकांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे. गंगेला अक्षरशः डबक्याचे स्वरूप आले आहे. दूषित पाणी जनावरेसुद्धा पित नसल्याचे निदर्शनास आले आहे. काही धार्मिक लोक गंगा गोदावरीच्या पवित्र पाण्यात स्नान करतात. त्यामुळे त्वचा रोग जडत आहेत. सध्या विविध गावात यात्रांची पर्वणी सुरू आहेत. दूरवरून तरुण मंडळी देवाला पाणी नेण्यासाठी येतात.