कोंभळी : पुढारी वृत्तसेवा : कर्जत येथून सायंकाळी येणारी बस वेळेत येत नसल्याने तालुक्यातील चांदे बुद्रुक येथील ग्रामस्थांनी बस अडविली. कर्जत येथून 4.45 ला निघणारी एसटी बस सहा वाजता येत असल्याने विद्यार्थ्यांना कर्जत बसस्थानकावर ताटकळत बसावे लागते. त्यामुळे घरी जायला अंधार पडत असल्याने चांदे बुद्रुक येथील ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत महामंडळाची बस चांदे येथे रोखून धरली. यावेळी राजेंद्र नवले, गोकुळ नवले, योगेश नवले, नितीन मुळे, अशोक नवले, संपत नवले, अनिल सूर्यवंशी, रमेश नवले, हंबीर नवले, राजेंद्र सूर्यवंशी, शरद सूर्यवंशी, बापूराव नवले, दशरथ नवले, भाऊसाहेब वाघमोरे, अरूण लामटूळे आदींसह ग्रामस्थ व पालक उपस्थित होते.
एसटी बस उशिरा येण्याबाबत श्रीगोंदा आगाराच्या अधिकार्यांशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले, ही आमची जबाबदारी नसून कर्जत बसस्थानकाच्या नियंत्रण कक्षाची जबाबदारी आहे. तसेच, रस्ते खराब झाल्याने प्रत्येक बसला 15 ते 20 मिनिटे उशीर होत आहे. बस वेळेवर येण्यासाठी नियोजन करू, असे आश्वासन त्यांनी दिले. मिरजगाव पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक सोमनाथ दिवटे यांनी महामंडळाच्या अधिकार्यांशी चर्चा केली व हा प्रश्न सोडविण्यासाठी सकारात्मक चर्चा केली. त्यानंतर ग्रामस्थ व पालकांनी एसटी बस सोडली.