जामखेड : पुढारी वृतसेवा : तालुक्यातील पाटोदा येथील भवर नदीवरील राष्ट्रीय महामार्गावरील पुलाची दोन दिवसांत दुरुस्ती करण्याच्या सूचना अधिकारी व ठेकेदार यांना दिल्या आहेत. नदीवरील पुलाचे तात्पुरते काम होणार असून, दोन दिवसांत पूल वाहतुकीसाठी सुरू होणार असल्याचे आ. राम शिंदे यांनी सांगितले. आ. शिंदे यांनी पाटोदा येथील भवर नदीच्या पूर परिस्थितीची पाहणी केली. नदीला 6 ऑक्टोबरपासून पूर येत असल्याने राष्ट्रीय महामार्ग असलेला जामखेड-कर्जत हा रस्ता वाहतुकीसाठी सतत बंद होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. राष्ट्रीय महामार्ग अधिकारी व ठेकेदार यांच्याशी चर्चा करून या पुलाचे काम तातडीने मार्गी लावून शनिवारी हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याच्या सूचना केल्या असल्याचे आ. शिंदे यांनी सांगितले. नागरिकांनी पूर आल्यावर नदी ओलंडू नये, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य दिनकर टापरे, सदाशिव कवादे, पंढरीनाथ शिकारे, पप्पू पारवे, अशोक महारनव, दिलीप कवादे, अक्षय आमटे, गफार पठाण, केदार वाबळे, अनिरुद्ध थोरात, देवा मोरे, दिलीप शिकारे, राजू कवादे, खंडू कवादे, विष्णू बामदळे, दादा मेडकर, बाबासाहेब गरड, दत्तू भवर आदी उपस्थित होते.
पूलाची उंची वाढविण्याची गरज
भवर नदीला पाणी आष्टी तालुक्यातील मुगगाव, मातावळी, मातकुळी, वनवेवाडी, करेवडगाव, पांढरी, पोखरी, हरिनारायण आष्टा व भातोडी या परिसरातून येते. पाटोदा येथे नदीवरील पुलाची उंची कमी असल्याने जास्त पाऊस झाल्यास पूल पाण्यात जाण्याचा धोका आहे. त्यामुळे पुलाची उंची वाढवण्याची गरज असल्याचे मत पाटोदा येथील नागरिकांनी व्यक्त केले आहे.