सुपा : पुढारी वृत्तसेवा : श्री क्षेत्र तुळजापूर येथील पालखी पारनेर तालुक्यात काही गावांमध्ये असते. ही परंपरा सन 1580 पासून चालत आली आहे. तालुक्यात जामगाव भागात आलेला पलंग दर्शनानंतर लोणीमार्गे हंग्यात, तर आज गुरुवारी सकाळी सुपा येथे येत आहे.
पलंगाची अख्यायिका अशी की, यादव काळात सुप्याचा चालुक्य राजा पुलकेशी याने यादवांशी युद्ध पुकारले. सूर्यास्तापर्यंत विजय मिळू दे, मी तुला बदामीला कर्नाटक राज्यात घेऊन जाईल, असा नवस राजाने केला. भवानी मातेच्या कृपेने पूलकेशीला यश मिळाले. त्यानंतर पुलकेशी भवानी मातेची मूर्ती पालखीतून सनई चौघड्याच्या निनादात बदामीला निघते.
तुळजापूरनजिक घाटशीळ गावी पालखी गेली असता, पालखीतून मूर्ती अचानक जमिनीवर पडली. पालखीचे तुकडे तुकडे झाले. जमीन फाटून पाणी बाहेर येऊ लागले. देवीची मूर्ती पाण्यावर तरंगताना दिसली. त्यामुळे त्याच ठिकाणी तुळजापूर भवानी मातेच्या मंदिराची उभारणी केली. तेव्हापासून पालखी तुळजापूरला गेल्यावर तिचे तुकडे करून ते अष्टमी किंवा विजयादशमीच्या होमात टाकतात. राजाने ज्या मार्गे पालखी नेली, त्याच मार्गाने तुळजापूरला जाण्याची परंपरा ताम्रपटात लिखित आहे. भवानी मातेचे मूळ वास्तव्य राहुरीत होते. आजही देवीच्या नावाने इनामी जमीन आहे. त्या जमिनीत बोरीची लागवड आहे. पालखीसाठी बोरीचे लाकूडच वापरले जाते.
भाद्रपद पौर्णिमेला राहुरीतून पालखी जामगाव येथे येते. संस्थानिक महादजी शिंदे व सुप्याचे शाबुसिंग पवार यांनी पालखी दर्शनाची परंपरा रुढ केली. जामगावच्या शिंदे वाड्यात व कै. पंढरीनाथ पाटील यांच्या वाड्यात आरतीचा मान होता. सुप्याचे राजे पुलकेशी यांचे वंशज संग्रामसिंह पवार व जगदेव पवार यांना आरतीचा मान आहे. पालखी दर्शनासाठी हंग्यात 25 गावांतून भाविक दर्शनास येतात. सायंकाळी शहांजापूरचे ग्रामस्थ पालखी नेतात.
सुपा हे गाव यादवकाळात सुकेवाडी म्हणून परिचित होते. तेव्हापासून पालखी येते. दरम्यान शाबुसिंग पवार राजांनी सुपे गाव म्हणून ओळख दिली. पूर्वी पालखी दर्शनासाठी नेण्याचा व आणण्याचा जो मार्ग होता, तो भोईंनी बदलला. आम्ही लवकरच या लोकांच्या विरुद्ध धर्मादाय आयुक्त व राजांच्या वंशजांकडे तक्रार करणार आहोत.
-संग्रामसिंह पवार, राजांचे वंशज, सुपा