[web_stories title="true" excerpt="false" author="false" date="false" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="10" order="DESC" orderby="post_date" view="circles" /]
श्रीगोंदा : पुढारी वृत्तसेवा : अलिकडच्या काळात बनवाबनवी करून अनेकांना ठणका मारण्याचे काम करण्यासाठी एक राजकीय गँग सक्रिय झाली आहे. खरेदी विक्री संघ निवडणुकीत त्यांना गुदगुल्या झाल्या. पण, अशा ठणका गँगचा बंदोबस्त करण्यासाठी आम्ही व नागवडे गट बाजार समिती निवडणुकीत एकत्र आलो आहोत, असे प्रतिपादन आमदार बबनराव पाचपुते यांनी केले. बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाचपुते व नागवडे गटातील समर्थकांचा श्रीगोंद्यात शुक्रवारी मेळावा झाला. यावेळी आमदार पाचपुते बोलत होते. ते म्हणाले, आम्ही व नागवडे समोरासमोर लढलो. पण, कधीच वैचारिक पातळी सोडली नाही. अलिकडच्या काळात मात्र ही वैचारिक पातळी घसरली आहे.
नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे म्हणाले, बाळासाहेब नाहाटा यांनी स्व.शिवाजीराव नागवडे, बबनराव पाचपुते यांना खोटेनाटे सांगून आपली पोळी भाजण्याचे काम केले. आता त्यांचा राजकीय अंत जवळ आला आहे. पाचपुते व नागवडे गटातील कार्यकर्त्यांनी एक जीवाने काम करून त्यांना धडा शिकवावा, असे आवाहन केले.
बाबासाहेब भोस म्हणाले, समोरची माणसं खोटं-नाटं सांगून सत्ता मिळवितात. पण, आता कार्यकर्ते सुज्ञ झाले आहेत. त्यामुळे बाजार समिती निवडणुकीत त्यांनी केलेल्या पापाची शिक्षा त्यांना मिळणारच आहे. दत्तात्रय पानसरे म्हणाले, बाळासाहेब नाहाटा यांनी राजकारणात नेत्यांना फसविणे आणि लोकांना टाकणे यापेक्षा दुसरे कोणतेच चांगले काम केले नाही. यावेळी अरुणराव पाचपुते ,भगवान पाचपुते ,बंडू जगताप, रामदास झेंडे, धर्मनाथ काकडे यांची भाषणे झाली आभार प्रताप पाचपुते यांनी मानले.