police 1 
अहमदनगर

नगर : गुहामध्ये धार्मिक स्थळावरून तणाव ; पोलिस, महसूलच्या मध्यस्थीने वादावर पडदा

अमृता चौगुले

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : राहुरी तालुक्यातील गुहा गावामध्ये धार्मिक स्थळावरून सुरू असलेला वाद पुन्हा उफाळला. दोन्ही गटाकडून दावे प्रतिदावे झाल्यानंतर मोठा जमाव एकमेकासमोर उभा ठाकल्याने तणाव निर्माण झाला. महसूल व पोलिस प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी वेळीच दखल घेत ग्रामस्थांची बैठक घेत समझोता घडवून आणल्यानंतर वाद निवळल्याची माहिती प्रांताधिकारी अनिल पवार यांनी दिली. गुहा येथील एका धार्मिक स्थळावरून दोन्ही गटामध्ये अनेक दिवसांपासून धुसफूस सुरूच आहे. शासकीय पातळीवर दोन्ही गटाकडून दावे प्रतिदावे करण्यात येत आहेत.

एका गटाने धार्मिक स्थळाचा नावाची नोंद केल्यावरून दुसर्‍या गटाने नाराजी व्यक्त केली. धार्मिक स्थळ ठिकाणी आरती व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केल्याने दोन्ही गट आमनेसामने आले. दोन्ही गटाकडील जमाव एकत्र आल्याने तणावात्मक परिस्थिती पाहता प्रांताधिकारी पवार, श्रीरामपूर विभागाचे पोलिस उपअधिक्षक संदीप मिटके, तहसीलदार फसियोद्दीन शेख व पोलिस निरीक्षक मेघशाम डांगे यांनी गुहा गावामध्ये कोणताही अनूचित प्रकार घडू नये म्हणून तत्काळ दक्षता घेतली. गावामध्ये दोन्ही गटाकडून दावे प्रतिदावे पाहता सायंकाळी बैठकीचे नियोजन ठरले. प्रांताधिकारी पवार, श्रीरामपूर विभागाचे पोलिस उपअधीक्षक मिटके यांच्यासह उपस्थित अधिकार्‍यांनी ग्रामस्थांना शांतता बाळगण्याचे आवाहन केले.

धार्मिक स्थळाबाबत दोन्ही गटाने एकमेकांना प्रतिबंध करू नये, आरती, प्रार्थना सुरूच ठेवावी. कोणीही एकमेकांना अडसर निर्माण करू नये. शांततेच्या मार्गाने आपली प्रार्थना करावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले. ग्रामस्थांनी दोन्ही गटाकडून होणार्‍या चुका मांडत तसे होऊ नये याबाबत उपाययोजना करण्याची मागणी केली. प्रशासनाने दोन्ही गटाला नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. कोणीही एकमेकांना त्रास होईल असे वागू नये. तसेच शासकीय कागदपत्रांच्या प्रक्रिया ही नियमानुसारच केली जाईल. जो पर्यंत शासकीय किंवा न्यायालयीन आदेश नाही तो पर्यंत कोणीही चुकीचे कृत्य न करण्याबाबत ग्रामस्थांचे एकमत झाले. ग्रामस्थांनी शांतता राखण्याचे आश्वासन प्रशासनाला दिले. महसूल व पोलिस प्रशासनाकडू गावाच्या शांततेबाबत सदैव सहकार्य केले जाईल असे आश्वासन प्रशासनाकडून मिळाले. गुहा गावात दिवसभर तणावात्मक परिस्थिती होती.

ग्रामस्थांनी सामंजस्याने निर्णय घ्यावेत. एकमेकांचे मन दुखावणारे कृत्य कोणीही करू नये. प्रशासन योग्य कामकाज करीत आहेत. अनूचित प्रकार घडू न देता एकोप्याने धार्मिक कार्यक्रम पार पाडावे.
                                                             – अनिल पवार, प्रांताधिकारी

गावातील तणाव सामंजस्याने मिटला आहे. कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. कोणीही चिथावणीखोर वक्तव्य केले किंवा कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास पोलिसांकडून कारवाई होईल.
                                                                – संदीप मिटके, उपअधीक्षक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT