अहमदनगर; पुढारी वृत्त्तसेवा : अनेक वर्षापासून राज्यातील सुशिक्षित बेरोजगार शिक्षक भरतीची वाट बघत होते. शिक्षक भरतीचा कार्यक्रम जिल्हा परिषद बिंदू नामावली कायम करून 15 ते 31 ऑगस्ट दरम्यान शिक्षक भरतीची जाहिरात पोर्टलवर प्रकाशित करणार आहे. 1 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर दरम्यान प्राधान्यक्रम ठरविण्यात येणार आहे. त्यानुसार गुणवत्ता यादी 10 ऑक्टोंबर ला प्रसिद्ध होईल. 11 ऑक्टोंबर ते 21 ऑक्टोबर दरम्यान नेमणुका देण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षक नेते तथा शिक्षक भारतीचे राज्य सचिव सुनील गाडगे यांनी दिली.
राज्यातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. याबाबत शिक्षक भारतीने शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची भेट घेऊन चर्चा केली असता त्यांनी सांगीतले की, 15 ऑगस्ट पासून राज्यात पवित्र प्रणालीद्वारे ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यामुळे शाळा निहाय रिक्त पदाचे ग्रहण सुटणार आहे.
रिक्त जागांचा अनुशेष भरून निघत नसल्याने त्याचा विपरीत परिणाम या शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर होत आहे. परिणामी राज्यातील अनेक शाळांमध्ये वर्ग जास्त असतानाही शिक्षक संख्या कमी आहे. शिक्षक भरती बाबत औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती दिली होती, आता कोर्टाने स्थगिती हटवली असून भरतीचे शेड्युल ठरवून दिले आहे. न्यायालयाने दिलेल्या सूचनेनुसार भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
दरम्यान, न्यायालयाने शिक्षकेतर कर्मचार्यांच्या आकृतीबंधास अंतरिम स्थगिती दिली असल्याने शिक्षकेतर कर्मचार्यांचे समायोजन तसेच पद भरती संदर्भात कार्यवाही करणे सद्यस्थितीत शक्य नाही, असे मंत्री केसरकर यांनी स्पष्ट केले आहे,अशी माहिती सुनिल गाडगे यांच्यासह जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, अहमदनगर महिला जिल्हाध्यक्षा आशा मगर, सोमनाथ बोंतले, जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब लोंढे, जिल्हासचिव विजय कराळे, उर्दू जिल्हाध्यक्ष मोहंमद समी शेख, उच्च माध्यमिकचे जिल्हाध्यक्ष रामराव काळे, जिल्हा सचिव महेश पाडेकर, संभाजी पवार, कार्यवाह संजय भुसारी, हनुमंत रायकर, नवनाथ घोरपडे, सुदाम दिघे, सिकंदर शेख. संजय पवार, संतोष देशमुख, किसन सोनवणे, कैलास जाधव,संतोष शेंदुरकर, संभाजी चौधरी , श्रीकांत गाडगे, रेवण घंगाळे जॉन सोनवणे, महिला जिल्हाध्यक्ष आशा मगर, सचिव विभावरी रोकडे, कार्याध्यक्ष मीनाक्षी सूर्यवंशी, रोहिणी भोर, शकुंतला वाळुज, छाया लष्करे, जया गागरे, अनघा सासवडकर, रुपाली बोरुडे, सोनाली अकोलकर विनाअनुदानितच्या अध्यक्षा रुपाली कुरूमकर आदींना दिली आहे.