नगर : पुढारी वृत्तसेवा : साखर वाटतात, त्यांनी हत्तीवरून साखर वाटावी आमचे काहीही म्हणणे नाही. पण, शेतकर्यांच्या कांदा निर्यतीवर, दूध प्रश्नावर त्यांनी बोलले पाहिजे. लोकसभेत त्यांना या विषयावर बोलताना पाहिले नाही, अशी टीका आमदार प्राजक्त यांनी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे नाव न घेता केली.
शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता शिबिराच्या पाश्वभूमीवर नगरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्हा बँकेत विचारले असता ते म्हणाले, शंभर कोटींच्या वरील रक्कमेतून संणकीय प्रणाली खरेदी करण्याचा घाट घातला होता. तो संचालक मंडळाने हाणून पाडला. नाबार्डच्या नियमावलीनुसार ते काम 25 ते 30 कोटी रुपयांमध्ये होणार आहे. कंसल्टंसी व इंटरिअर डिझाईनरचे पैसे वगळे होते. परंतु, सजग संचालकामुळे बँकेत होणार्या गैरप्रकारला आळा बसला. केवळ चेअरमन म्हणजे बँक नाही. संचालक मंडळालाही अधिकार असतात यावरून सिद्ध झाले, असे सांगत त्यांनी बँकेच्या चेअरमनच्या कारभारावर निशाना साधला.
बँकेत नव्याने भरती होणार आहे, असे ऐकले आहे. परंतु, बँकेत नोकर भरती करताना नामांकित संस्थेमार्फत करावी. राज्य सरकारने भरती प्रक्रिया टीसीएस, आयबीपीएस सारख्या संस्थेला द्यावी. अन्यथा भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार होऊन गरजवंत व गुणवंतला संधी मिळत नाही. ज्याला नोकरीची गरज नाही, असे लोक जागा काबीज करतात, असेही तनपुरे म्हणाले.
नगरच्या दोन्ही जागा राष्ट्रवादीने लढवाव्यात अशी माझी इच्छा आहे. परंतु, जागा वाटपाचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार आहे. महाविकास आघाडीत नगर दक्षिणची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच लढविणार आहे. तिथे काँग्रेस, शिवसेनेचा काही संबंध नाही. वरिष्ठांच्या यादीत काही उमेदवारांची नावे आहे. उमेदवार हा स्थानिकच असणार आहे. पक्षाने आदेश दिल्यास मी उमेवारी करू शकतो, असे आमदार प्राजक्त तनपुरे म्हणाले.
हेही वाचा