राहुरी : पुढारी वृत्तसेवा : राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील ग्रामसभेमध्ये गायरान जमीन अतिक्रमण हटविण्याच्या निर्णयाचा तीव्र विरोध करण्यात आला. मोरवाडी हे महसुली वेगळे झाल्याने गावठाण हद्दीसाठी क्षेत्र देण्याचा निर्णय झाला. गावातील विविध विकास कामांबाबत सकारात्मक चर्चा झाली. टाकळीमिया येथे आयोजित ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी असलेले सरपंच विश्वनाथ निकम यांच्या मार्गदर्शनात झाली. या ग्रामसभेमध्ये पंचायत समितीचे सुरेश निमसे यांनी गायरान जमिन अतिक्रमण हटाव मोहिमेबाबत नाराजी व्यक्त केली.
राहुरी तालुक्यातील जनता ही प्रकल्पग्रस्त व धरणग्रस्त आहे. त्यातच के. के. रेंज व इतर शासकीय प्रयोजनाने त्रस्त राहुरीकरांनी विस्थापित होऊन जेथे जागा मिळेल, तेथे आपले आयुष्य उभारले. विस्थापित झाल्यानंतर दोन पिढ्या झाल्यानंतर पुन्हा गायरान मुद्याने सर्वसामान्यांमध्ये धडकी आणली आहे. शासनाने तत्काळ पुनर्विचार याचिका दाखल करण्याची मागणी निमसे यांनी ग्रामसभेत केली. सर्व ग्रामस्थांनी एकमुखी ठराव संमत केला.
यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र मोरे, माजी उपसरपंच सुभाष जुंदरे, ग्रामपंचायत सदस्य गिरीश निमसे, पंचायत समितीच्या सदस्या सुनिता निमसे, सेवा निवृत्त वन अधिकारी भगीरथ निमसे, बाळासाहेब निमसे, प्रा. सुभाष शिंदे व ग्रामविकास अधिकारी यांनी चर्चेत सहभाग घेत विविध विकासकामांना चालना देण्याचा निर्णय घेतला.
गावातील रस्ते, पाणी व इतर सोय सुविधांबाबत ग्रामस्थांनी ठराव मांडले.