चिचोंडी पाटील : पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील शेतकर्यांनी पेरणी केलेल्या सोयाबीन पिकाला वेळेवर पाऊस न मिळाल्याने यावर्षी उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. तालुक्यात सुरवातीला पावसाने दडी मारल्याने सोयाबीनची मोठ्या फुलगळ झाली. याचदरम्यान पिकाची वाढही खुंटली. सोयाबीनला आलेल्या शेंगाही पावसाअभावी पापडी बनण्यास सुरुवात झाली होती. मात्र, दोन-तीन दिवसांत झालेल्या पावसाने शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
अनेक शेतकर्यांनी मूग, ऊस, बाजरी या पिकांकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळेच सोयबीनला पसंती दिली आहे. रानडुकरांनी मागील वर्षीत या पिकांचे मोठे नुकसान केले होते. याबाबत अनेकदा वन विभागाकडे ग्रामस्थांनी तक्रारी करूनही वन विभागाने नेहमीच दुर्लक्ष केले. सोयाबीनला मागील वर्षी योग्य हमीभाव मिळल्याने नगर तालुक्यात यंदा सोयाबीनची पेरणी मोठ्या प्रमाणात झाली. प्रतिकूल परिस्थितीमुळे यंदा उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे.
यंदा सोयाबीनची मोठ्या प्रमाणात पेरणी झाली होती. ऐन पीकवाढीच्या तोंडावर पावसाने दडी मारली. त्यामुळे सोयाबीन शेंग पोसण्यात अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे यंदा सोयाबीन उत्पादन घट होण्याची शक्यता आहे
– मंजाबापू घोरपडे, शेतकरी सेवा केंद्र, माथणी