नगर, पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्यात वाढत्या जातीय तणावाच्या घटनांना आमदार नितेश राणे हेच कारणीभूत असून, शहरात राणे यांनी प्रक्षोभक व चिथावणीखोर वक्तव्य केल्याने तणाव वाढला आहे. शेवगाव येथील घटनेलाही तेच कारणीभूत आहेत, असा दावा करत आ. राणे यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करावा व त्यांना अटक करावी. तसेच, नगर जिल्हा बंदी करावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकार्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शेवगाव येथील दंगलही चिथावणीखोर भाषणामुळेच झाली आहे. या दंगलीची सखोल चौकशी व्हावी व जे खरे गुन्हेगार आहेत, त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी. तसेच तेथील व्यापारी वर्गाला संरक्षण मिळावे. राणे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, त्यांना नगर जिल्ह्यात बंदी करावी. अन्यथा शिवसेनाच्या वतीने जिल्हाभर अंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
यावेळी जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी, रावसाहेब खेवरे, उपजिल्हा प्रमुख गिरीश जाधव, शहरप्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अशोक गायकवाड, स्थायी समिती सभापती गणेश कवडे, नगरसेवक श्याम नळकांडे, संजय शेंडगे आदी उपस्थित होते.