कोळगाव / वाळकी : पुढारी वृत्तसेवा : साकळाई जलसिंचन योजनेचे भूमिपूजन लवकरच केले जाणार असून, त्याचा सर्व्हे करण्यासाठी तातडीने निधी देण्यात येईल. येत्या आठ ते दहा दिवसांत याबाबत निर्णय घेतला जाणार आहे, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. लोणी येथे झालेल्या कार्यक्रमावेळी साकळाई योजना कृती समितीच्या वतीने उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेण्यात आली. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे, आमदार बबनराव पाचपुते, खा.डॉ.सुजय विखे, माजी आमदार शिवाजी कर्डिले, कृती समितीचे अध्यक्ष बाबा महाराज झेंडे, नारायणराव रोडे, सरपंच सुरेश काटे, सोमनाथ धाडगे, डॉ.योगेंद्र खाकाळ, ज्ञानदेव भोसले, जलसंपदाचे अधिकारी वाळके आदी उपस्थित होते.
साकळाईचा प्रश्न नगर व श्रीगोंदा तालुक्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा असून, जिरायत पट्ट्यातील 35 गावांना त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकरी मोठ्या अपेक्षेने या योजनेकडे डोळे लावून बसले आहेत. नुकतेच या योजनेच्या सर्वेक्षणासाठी निधी मंजूर करण्यात आला असून, लवकरच सर्वेक्षण पूर्ण होऊन योजना मार्गे लागण्याकडे शेतकरी अपेक्षेने पाहत आहेत.