वाळकी : पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील भातोडी तलावातून रब्बी हंगामासाठी मंगळवारी (दि.14) आवर्तन सोडण्यात आले आहे. हे आवर्तन 15 दिवसांचे असून, या दरम्यान तलावातून 6 दशलक्ष घनफूट पाणी सोडले जाणार आहे. या आवर्तनामुळे परिसरातील चिचोंडी पाटील, भातोडी, दशमी गव्हाण, सांडवे, मांडवे या गावांच्या शेतीचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांच्या उपस्थितीत हे आवर्तन सोडण्यात आले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे, मांडवेचे सरपंच सुभाष निमसे, दशमी गव्हाणचे सरपंच उद्धवराव कांबळे, उपसरपंच बाबासाहेब काळे, सांडवेचे सरपंच अमोल निक्रड, उपसरपंच भाऊ घोलप, भातोडीचे सरपंच विक्रम लबडे, उपसरपंच राजूभाई पटेल, मदडगावचे सरपंच साहेबराव शेडाळे, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष पापामिया पटेल, उपअभियंता वाळके, मोरे यांच्यासह कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
खासदार डॉ.सुजय विखे, आमदार बबनराव पाचपुते व माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या सूचनेनुसार या गावांतील सर्व राजकीय पदाधिकारी व ग्रामस्थांच्या मागणीनुसार भातोडी येथील शासकीय विश्रामगृहात कालवा सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीत पाणी सोडण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार मंगळवारी पाणी सोडण्यात आले. हे आवर्तन 15 दिवसांचे असून, तलावातून 6 दशलक्ष घनफूट पाणी सोडले जाणार आहे. त्यानंतर 33 टक्के पाणी राखीव ठेवण्यात येणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून सदर पाटाची दुरुस्ती सुरू असल्याने आवर्तन सोडण्यास उशीर झाला. परंतु, सद्यस्थितीत दुरूस्तीचे काम बाजूला ठेवून आवर्तन सोडण्यात आले. आवर्तन पूर्ण झाल्यानंतर उर्वरित पाटाची दुरुस्ती शासनाच्या वतीने उपलब्ध झालेल्या मशीनच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याची माहिती अधिकार्यांनी दिली. आवर्तन सुटल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.