अहमदनगर

नगर : महसूल पथकाने पकडली वाळूची 5 वाहने

अमृता चौगुले

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदी पात्रालगत असलेल्या खांडगाव, कासारवाडी, राजापूर, मंगळापूर, शिवारातून अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे 5 वाहने संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांच्या भरारी पथकाने पकडले.
संगमनेर तालुक्यातील विविध गावाच्या नदीपात्रामधून वाळू उपसा करण्यास महसूल मंत्र्यांनी बंदी घातलेली असताना सुद्धा नदीपात्रातून पिकअप, ट्रॅक्टर, रिक्षा, गाढवे आणि बैलगाडीद्वारे विनापरवाना वाळूची वाहतूक राजेरोसपणे सुरू आहे याबाबत तहसीलदार अमोल निकम यांनी निवासी नायब तहसीलदार गणेश तळेकर, नायब तहसीलदार उमाकांत कडनोर, कामगार तलाठी कोमल तोरणे, धनराज राठोड, युवराज जरवाल, बाबा शेख कर्मचार्‍यांचे भरारी पथक तयार केले आहे.

या भरारी पथकाद्वारे संगमनेर तालुक्यातील खांडगाव आणि राजापूर येथून पिकअप गाडी, त्याचबरोबर कासारवाडी शिवारातून रिक्षा व मंगळापूर शिवारातून जीप व रिक्षा अशी 5 वाहने वाळू चोरी करताना पकडले आहेत. महसूलच्या फरारी पथकाने पकडलेली सर्व वाळूची वाहने संगमनेर तहसील कार्यालयामध्ये व पोलिस वसाहतीमध्ये लावण्यात आली आहेत. त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

वाळूचा आता छोट्या वाहनांमधून प्रवास

संगमनेरच्या प्रवरा नदीपात्रातून दिवसाढवळ्या राजरोसपणे छोट्या मोठ्या वाहनातून वाळू तस्करी सुरूच आहे. त्यातच आता वाळूचे भाव सुद्धा गगनाला जाऊन भिडलेले आहेत. शासन जोपर्यंत वाळूचे नवीन धोरण ठरवत नाही तोपर्यंत छोट्या-मोठ्या वाहनातून वाळू तस्करी होत असल्याने महसूल प्रशासनाची सुद्धा चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. त्यातच आता महसूल प्रशासनाने गेल्या आठ दिवसापासून वाळू तस्करांवरती दंडात्मक कारवाई करण्याचा धडाका सुरू केला असल्यामुळे वाळू तस्करांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

SCROLL FOR NEXT