अहमदनगर

योग्यता प्रमाणपत्रासाठी दंडाची अट शिथिल करा: रिक्षा-टॅक्सी संघटना

Sanket Limkar

नगर : पुढारी वृत्तसेवा : अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक मालक संघटनेच्यावतीने रिक्षा प्रमाणपत्रासाठी लागणारा दंड स्थगित करण्यात यावा, या मागणीचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष अविनाश घुले, कार्याध्यक्ष विलास कराळे, उपाध्यक्ष दत्ता वामन, गणेश आटोळे, नासीर खान, सुधाकर साळवे आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.

अविनाश घुले म्हणाले, शासनाच्या नियमाप्रमाणे रिक्षाला दरवर्षी योग्यता प्रमाणपत्र घ्यावे लागते. त्यासाठी विमा, विविध प्रकारची फी, वाहन दुरुस्ती इत्यादी खर्च कसाबसा करावा लागतो. त्यामुळे योग्यता प्रमाणपत्र घेण्याला विलंब होतो. परंतु, शासनाने दर दिवसाला 50 रुपये दंडाची पठाणी वसुली करीत आहे. हा दंड अन्यायकारक आहे.

मोठ-मोठ्या शहरात रिक्षा चालकांचे दर आणि छोटे शहर, ग्रामीण भागातील रिक्षा भाडे यात मोठी तफवत असते. त्यामुळे सरसकट सर्वांना एकाच नियमाने दंड आकारणे योग्य नाही. रिक्षा चालक कसेतरी करून रिक्षाच्या माध्यमातून आपला उदरनिर्वाह चालवत आहेत. तंदुरुस्ती प्रमाणपत्र घेण्यास उशीर झाल्याने एवढा मोठा दंड भरणे अवघड होत आहे. तरी या दिवसाला 50 रुपये दंडाची अट शिथिल करावी. माफक दंड आकारण्यात यावा. तो भरण्यास सर्व रिक्षा चालक तयार होतील. तरी केंद्र सरकारच्या मूळ परिपत्रकाला स्थगिती मिळावी. सध्या तंदुरुस्ती प्रमाणपत्र न घेतलेल्या रिक्षांना ते घेण्यासाठी मुदत मिळावी. त्या मुदतीनंतर उशिरासाठी माफक रक्कम आकारावी, अशी मागणी जिल्हाधिकारी व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT