अहमदनगर

नगर : 68 लाख लिटरची जुनी पाण्याची टाकी कार्यान्वित

अमृता चौगुले

नगर; पुढारी वृत्तसेवा : शहराची वाढती लोकसंख्या आणि त्या तुलनेत कमी पाणी उपलब्ध होत असल्याने पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. दरम्यान, नगर शहराला वसंत टेकडी येथील जुनी 68 लाख लिटर पाण्याच्या टाकीतून पाणीपुरवठा होत होता. त्या टाकीचे दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. ते काम आज पूर्ण झाले असून, त्या टाकीतून पाणीपुरवठा कार्यन्वित केला आहे. त्यामुळे पाणीप्रश्न सुटण्यास मदत होणार आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. वसंत टेकडी येथील जुन्या 68 लाख लिटर पाण्याची टाकी गुरूवारी आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते कार्यन्वित करण्यात आली.

यावेळी आयुक्त डॉ. पंकज जावळे, उपमहापौर गणेश भोसले, मनपा विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, स्थायी समितीचे सभापती कुमारसिंह वाकळे, नगरसेवक अविनाश घुले, नगरसेवक विनीत पाऊलबुद्धे, नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, नगरसेवक सुनील त्र्यंबके, नगरसेविका दीपाली बारस्कर, नगरसेवक समद खान, नगरसेवक प्रकाश भागानगरे, नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार, बाळासाहेब बारस्कर, शिवाजी चव्हाण, अमोल गाडे, तायगा शिंदे, नगरसेवक मनोज दुल्लम, बाबा खान आदी उपस्थित होते.

आमदार जगताप म्हणाले, नगर शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे समजले जाणार्‍या अमृत योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यातून शहराला मुबलक 118 लाख लिटर पाण्याचा साठा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नगर शहराचा कायमस्वरूपी पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे.

नगर शहराला वसंत टेकडी येथील जुनी 68 लाख लिटर पाण्याच्या टाकीतून पाणीपुरवठा होत होता अनेक वर्षाची ही टाकी असल्यामुळे तिची गळती मोठ्या प्रमाणात सुरू झाली होती तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेऊन ते काम पूर्ण होऊन आज या टाकीमध्ये पाणीपुरवठा करून कार्यान्वित केला आहे.

118 लाख लिटर पाणी प्रतिदिन मिळणार
मुळा धरणातून अमृत पाणी योजनेचे काम पूर्ण झाले असून विळद पंपिंग स्टेशन येथे पाण्याची मोटर बसविण्याचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. त्यानंतर अमृत पाणीयोजनेचे पाणी वसंत टेकडी येथे पडणार आहे. त्यामुळे सुमारे 118 लाख लिटर पाणी नगरकरांना प्रतिदिन मिळणार आहे. नगर शहराला पूर्णदाबाने पाणी मिळणार आहे, असे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT