नगर : पुढारी वृत्तसेवा : ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ऑनलाईन उमेदवारी अर्ज भरण्यास अडथळा निर्माण झाल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने आता ऑफलाईन (पारंपरिक पध्दतीनुसार) अर्ज स्वीकारण्यास मुभा दिली आहे. याशिवाय शेवटच्या दिवशी साडेपाच वाजेपर्यंत अर्ज भरण्यास सवलत दिली आहे. आयोगाच्या या निर्णयामुळे गुरुवारपासूनच उमेदवारी अर्ज ऑफलाईन सादर करण्यात आले आहेत. ऑफलाईनमुळे इच्छुक उमेदवारांचा वेळ आणि पैशाची बचत होणार आहे. नोव्हेंबर व ऑक्टोबर या दोन महिन्यांत मुदत संपलेल्या जिल्ह्यातील 203 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.
त्यानुसार 18 डिसेंबरला निवडणुका होत आहेत. त्यादृष्टीने उमेदवारी अर्ज भरण्यास 28 नोव्हेंबरपासून प्रारंभ झाला आहे. उमेदवारी अर्ज ऑनलाईन भरणे बंधनकारक आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी कॅफेवर गर्दी वाढली. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी जवळपास सातशे ते आठशे रुपये खर्च येत आहे. एवढा खर्च भरुनही सर्व्हर कधी साथ देईल, याचा भरवसा नसल्यामुळे इच्छुकांना दिवसभर कॅफेवरच थांबावे लागत आहे.
राज्यातील एकाच वेळी साडेसात हजार ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका आहेत. त्यामुळे सर्व्हरवर ताण येऊ लागला. त्यामुळे उमेदवारी अर्ज ऑनलाईन भरण्यास प्रतिसाद मिळेनासा झाला आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास शेवटचे दोन दिवस बाकी आहेत. त्यामुळे दोन दिवस अर्ज भरण्यास मोठी गर्दी होणार आहे. अशा परिस्थितीत सर्व्हरमध्ये समस्या निर्माण होऊन, इच्छुकांना उमेदवारी अर्ज भरण्यास अडथळा निर्माण होऊन अनेकांना निवडणूक लढविणे अवघड होणार आहे. त्यामुळे काही राजकीय पक्षांच्या पदाधिकार्यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे विनंती केली.
सर्व्हच्या समस्येमुळे कोणी निवडणूक लढविण्यापासून वंचित राहू नये यासाठी राज्य निवडणूक आयोगाने उमेदवारी अर्ज ऑफलाईन भरण्यास मुभा दिली आहे. शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. 3 वाजेपर्यंत अर्ज भरण्यास मुदत होती. यामध्ये आता अडीच तास वेळ वाढवून दिला आहे. त्यामुळे इच्छुकांना आता सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहे.
फउपलब्ध होणार्या उमेदवारी अर्जाची 5 नोव्हेंबर रोजी छाननी होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 7 डिसेंबर असून, याच दिवशी निवडणूक रिंगणातील चित्र स्पष्ट होणार आहे.