लोणी : पुढारी वृत्तसेवा : सभासदांना उच्चांंकी भाव देतानाच सर्वसामान्य जनतेला दिवाळी निमित्त मोफत पाच किलो साखर देऊन सर्वांचीच दिवाळी गोड करणार असल्याची माहिती खा.डॉ सुजय विखे पाटील यांनी दिली. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या 74 व्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी खा. डॉ. विखे पाटील बोलत होते. जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या अध्यक्षेतेखाली झालेल्या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालीनीताई विखे पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे प्रवरा बँकेचे अध्यक्ष डॉ. भास्करराव खर्डे ट्रक सोसायटीचे अध्यक्ष नंदु राठी, प्रवरा भाजीपाला सोसायटीच्या अध्यक्षा गिताताई थेटे, ज्येष्ठ संचालक शांतीनाथ आहेर, राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, कारखान्याचे अध्यक्ष कैलासराव तांबे, उपाध्यक्ष सतीषराव ससाणे, प्रवरा बँकेचे उपाध्यक्ष मच्छींद्र थेटे, कार्यकारी संचालक अमोल पाटील सर्व संचालक सभासद आणि कामगार उपस्थित होते.
खा. विखे पाटील म्हणाले, मागणी न करता सर्वांना न्याय देण्याची भूमिका ही आपली राहिली आहे. उच्चांकी भाव मागील वर्षी दिला. यावर्षीचा भाव तीन हजार रुपये प्रतिटन अगोदरच जाहीर केला आहे. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आदर्श काम करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शिर्डी दौरा आपल्यामुळेच यशस्वी झाल्याबद्दल सर्वाचे आभार मानले.
सध्या मराठा आरक्षरणांसाठी आंदोलन सुरू आहे. आरक्षण मिळावे ही मागणी आपली देखील असून यासाठी विखे पाटील परिवार जनते सोबत असल्याचे स्पष्ट करून विरोधकां विरोधात योग्यवेळी त्यांच्या मैदानात उत्तर देणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
प्रवरा शैक्षणिक संकुलाने तालुक्यातील मराठा आणि ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना कोविड संकट लक्षात घेवून 50 टक्के फी सवलत देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. असा निर्णय घेणारे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील राज्यातील एकमेव नेते ठरले असल्याकडे लक्ष वेधून टीका करा पण ती करतांना आपण काय केले हे पण जनतेला सांगा, असा टोलाही त्यांनी लगवला. दिवाळीसाठी शिर्डी मतदार संघातील सर्व रेशनकार्ड धारकांना पाच किलो साखर मोफत सेवा देऊन त्यांची दिवाळी गोड करणार असून त्याचे वितरण 5 नोव्हेंबर पासून होणार असल्याचे सांगितले. माजीमंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यावेळी म्हणाले, केंद्र सरकारच्या साखर धोरणामुळे साखर उद्योगास बळ मिळत असल्याचे सांगितले. डॉ. भास्करराव खर्डे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रारंभी कारखान्याचे अध्यक्ष कैलासराव तांबे यांनी प्रास्ताविक तर उपाध्यक्ष सतीषराव ससाणे यांनी आभार मानले.