नगर : पुढारी वृत्तसेवा : एसटी महामंडळाकडून 15 डिसेंबरपासून नागपूर ते शिर्डी या समृद्धी मार्गावर शयनआसनी बससेवा सुरू करण्यात येत आहे. यासाठी तेराशे रुपये प्रवासभाडे आकारले जाणार आहे. नागरिकांना जलद प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणेसाठी नागपूर ते मुुंबई समृध्दी महामार्ग निर्माण करण्यात आलेला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी समृध्दी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्याचा लोकार्पण सोहळा झाला. सदर मार्ग नागरिकांच्या प्रवासासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
प्रवाशांना जलद व आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणेसाठी महांडळाकडून गुरुवारपासून बससेवा सुरु होत आहे.
या बसमध्ये 30 आसने बसण्यासाठी उपलब्ध असून, 15 शयन आसने आहेत. नागपूर व शिर्डी या दोन्ही ठिकाणांहून दररोज रात्री 9 वाजता बस सुटेल. पहाटे 5.30 वाजता संबंधित ठिकाणी पोहाचणार आहे. या बससेवेमुळे प्रवाशांच्या सध्याच्या प्रवास अंतरात 102.5 कि.मी. व वेळे'मध्ये 4.15 तास बचत होणार आहे. यासाठी प्रौढ व्यक्तिस 1300 रुपये व मुुलांसाठी 670 रुपये इतके प्रवासभाडे आकारणी करण्यात येणार आहे.75 वर्षांवरील अमृत ज्येष्ठांना तिकिट दरात शंभर टक्के तर तर 65 ते 75 दरम्यानच्या ज्येष्ठांना 50 टक्के सवलत असणार आहे.
याशिवाय नागपूर ते औरंगाबाद (जालनामार्गे ) या मार्गावरही समृध्दी महामागार्र्व्दारे शयन आसनी बससेवा सूरू करण्यात येत आहे. सदरची बससेवा ही नागपूर व औरंगाबाद या दोन्ही ठिकाणाहून दररोज रात्री 10 वाजता सुटणार आहे. व जालना मार्गे पहाटे 5.30 वाजता पोहोचणार आहे. बससेवेमुुळे प्रवाशांच्या प्रवास अंतरात 50.9 कि. मी. व प्रवास वेळेमध्ये 4.40 तास इतकी बचत होणार आहे.
नगर जिल्ह्यातील नागरिकांनी या बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळाचे अहमदनगर विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ यांनी केले आहे