कोळपेवाडी (नगर), पुढारी वृत्तसेवा: पावसाळ्यात कुठेही आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास अडचणीच्या वेळी नागरिकांना तातडीने मदत मिळाली पाहिजे. त्यासाठी सर्व विभागांनी संभाव्य आपत्तीचे योग्य नियोजन करावे. आलेली आपत्ती नागरिकांवर आली नसून ती आपत्ती आपल्यावर आली आहे, असे समजून काम करा अशा सूचना देत आ. आशुतोष काळे यांनी देऊन अधिकार्यांची चांगलीच खरडपट्टी काढली.
कोपरगाव शहर व तालुक्यात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर निर्माण होणार्या संभाव्य अडचणी दूर करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना बाबत आ. काळे यांनी महसूल, कोपरगाव नगरपरिषद, पंचायत समिती, शहर व ग्रामीण पोलीस स्टेशन, कृषी अधिकारी,उर्जा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य, पशु वैद्यकीय, अग्निशमन, पाटबंधारे, जलनिःस्सारण आदी विभागाच्या अधिकार्यांसमवेत तहसील कार्यालयात बैठक घेतली. आपत्तीच्या काळात योग्य नियोजन करण्याची जबाबदारी अधिकार्यांची असून योग्य नियोजन न झाल्यास याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित करून अधिकार्यांची चांगलीच कान उघाडणी करून त्यांना सूचना केल्या.
सर्व पुलांच्या कामाची पाहणी करून घ्या. कोपरगाव शहरातील ब्रिजलाल नगर येथे येणार्या पाण्याचा निचरा होण्यासाठी उपाय योजना करा, खडकी नाला, हद्दवाढ भागातील कर्मवीर नगर मध्ये येणार्या पाणी वाहून जाण्यासाठी ड्रेनेज लाईन टाका, पावसाळयापूर्वी खंदकनाल्याची साफ सफाई पूर्ण करा, जेऊर पाटोदा शिव रस्त्यालगत असलेला नैसर्गिक नाला खुला करण्याच्या सूचना दिल्या. मागील वर्षी निर्माण झालेल्या अडचणी यावर्षी पुन्हा निर्माण होणार नाही याची जलनिःस्सारण विभागाने खबरदारी घेऊन पाण्याचा निचरा होण्यासाठी नैसर्गिक ओढे-नाल्यांची साफसफाई समितीने पावसाळ्याच्या आत तातडीने पूर्ण करून घ्यावी. याबाबत या विभागाने पूर्ण झालेली कामे व प्रलंबित असलेल्या कामांचा आढावा घेऊन प्रलंबित कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
या बैठकीसाठी प्रभारी तहसीलदार विकास गंबरे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, भूमी अभिलेखचे एस.जे. भास्कर, जि. प. उपअभियंता सी.डी. लाटे, उपविभागीय जलसंधारण अधिकारी एस.आर. वाघ, पी.एस. खेमनर, कृषी अधिकारी मनोज सोनवणे, गोदावरी डावा तट कालवा उपविभागीय अभियंता बी.जी. शिंदे, सहाय्यक अभियंता एस.टी. ससाणे, एस.बी. चौधरी, बी.आर. पवार, गोदावरी कालवे जलनिस्सारण उपविभागीय अभियंता किरण तुपे, कि.गो. शिंदे, अ.भा. शिंदे, तालुका पशुधन अधिकारी डॉ. डी.पी. दहे, पं. स. पशुधन विकास अधिकारी डॉ.डी.एन.जामदार, पंचायत समिती सहाय्यक अभियंता बी.के. साबळे, पंचायत समिती कृषी अधिकारी एस.डी. कोष्टी, ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस.एम. यादव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास घोलप, आगार व्यवस्थापक अमोल बनकर, ग्रामीण पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, शहर पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, आदी उपस्थित होते.
ग्रामीण भागातील सुरेगाव, मंजूर, कोळगाव थडी, पोहेगाव, सोनेवाडी, हरिसन ब्रँच, डाऊच, टाकळी-ब्राम्हणगाव, दहेगाव, खिर्डी गणेश, सी.व्ही. 29 व कॅटल ब्रीडिंग चर योजनाचे काम पूर्ण करा. ग्रामीण भागातील शहापूर वशापांढरी शिंदे वस्ती पर्यंत येणार्या पाण्याचे सांडव्याचे नियोजन, खडकी नाला पूल, संवत्सर दशरथवाडी वाघी नाला पूल, मायगाव देवी चौफुली साईड गटार, बक्तरपूर बंधारा गेट, संवत्सर मनाई पूल, धारणगाव येथील नानासाहेब दवंगे यांच्या शेतात साचणारे पाणी, जेऊर पाटोदा येथील आनंद नगर येथे पावसाळ्यात कायम साचणारे पाणी आदी समस्या सोडवा अशा सूचना आ. काळे यांनी दिल्या.