अहमदनगर

संगमनेरच्या 50 गावांमध्ये मियावाकी वन प्रकल्प

अमृता चौगुले

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : सप्रेम, नवदृष्टी या संस्था संगमनेर पंचायत समिती आणि डॉर्फ केटल कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील 50 गावांमध्ये प्रत्येकी अवघ्या एक गुंठ्यात 42 विविध प्रकारच्या 300 झाडांची लागवड करण्याचा 'मियावाकी' वन प्रकल्प राबविण्यात आला आहे. या वृक्षलागवडीने प्रत्येक गावात सरासरी 2 टक्के तरी तापमान कमी होण्यास मदत होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकल्पाचा ग्रामपंचायतींनाही आर्थिक लाभ होणार आहे.

तालुक्यातील 147 गावांपैकी पळसखेडे, तिगाव, करुले, तळेगाव दिघे, झोळे, मिर्झापूर धांदरफळ, सावरचोळ, पिंपळगाव कोंझिरा, हिवरगाव पठार व घारगाव या प्रमुख गावांसह 50 गावांमध्ये गटविकास अधिकारी अनिल नागणे यांच्या मार्गदर्शनाखाली मियावाकी प्रकल्प राबविण्यात आला आहे. अवघ्या एका गुंठ्यात हिरडा, बेहडा, चिंच, वड आवळा, पिंपळ, नागकेशर अशा 42 प्रकारची 300 झाडे लावण्यात आली आहेत. ही झाडे जवळपास पाच ते सहा फूट उंच झाली आहेत. वरील गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, कर्मचारी हे सर्वजण चांगल्या प्रकारे काळजी घेत आहेत. काही गावांमध्ये पाण्याची कमतरता असतानाही ग्रामपंचायतीने या प्रकल्पाची काळजी घेतली आहे.

डॉर्फ केटल जंगल कप स्पर्धा 2023 या माध्यमातून ज्या 50 गावांनी हा मियावाकी प्रकल्प राबवला आहे, त्यांच्यासाठी प्रथम 1 लाख रुपये, द्वितीय 75 हजार, तर तृतीय 50 हजार रुपये असे पुरस्कार डॉर्फ केटल केमिकल्स कंपनीमार्फत दिले जाणार आहेत. विशेष म्हणजे भारतातील पहिलाच मियावाकीचा प्रकल्प संगमनेर तालुक्यात राबविला जात आहे. या स्पर्धेत सप्रेम संस्था आणि संगमनेर पंचायत समिती प्रशासनानेसुद्धा मुख्य भूमिका बजावली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून एक मियावाकी जंगल तयार होणार आहे. यासाठी गटविकास अधिकारी अनिल नागणे व वरील गावांतील सर्व ग्रामसेवक जनजागृतीकरिता विशेष परिश्रम घेत असल्याचे नवदृष्टी संस्थेचे अध्यक्ष डॉ. नागेश टेकाळे यांनी 'पुढारी'शी बोलताना सांगितले.

काय आहे मियावाकी पद्धत..
अकिरा मियावाकी या जपानी वनस्पतीशास्त्रज्ञांनी निर्माण केलेल्या पद्धतीला मियावाकी वननिर्मिती पद्धत असे नाव पडले आहे. निकृष्ट जमिनीवर त्वरित वनाच्छादन निर्माण करण्यासाठी सर्वांत प्रभावी वृक्षलागवड पद्धतींपैकी ही नैसर्गिक वनीकरणाच्या तत्त्वांवर आधारित पद्धत आहे. परिसरात उगवणार्‍या पारंपरिक झाडांचाच वापर यात केला जातो. या पद्धतीने लागवड केलेली झाडे खूप वेगाने वाढतात, जंगल निर्मितीची प्रक्रिया सुरू करतात आणि वातावरणातील अधिक कार्बन शोषून घेतात. विविध वन परिसंस्था त्वरित तयार करण्यासाठी ही आदर्श पद्धत आहे. सध्या हवामान बदलाच्या आणीबाणीच्या संदर्भात आणि जैवविविधतेच्या जागतिक हानीबद्दल तीव्र इशारे दिले जात असताना वैविध्यपूर्ण, निरोगी जंगले त्वरित निर्माण करण्यास सक्षम असणारी मियावाकी पद्धत महत्त्वपूर्ण ठरू शकते.

मियावाकी प्रकल्पासाठी शासनाचा एकही रुपया खर्च होणार नसून, सर्व खर्च डॉर्फ केटल कंपनीच्या सीएसआर निधीतून केला जाणार आहे. सहभागी गावांचा लोकसहभाग असल्याने पर्यावरणाच्या संदर्भात लोकजागृतीही होणार आहे. हा प्रकल्प राबविणार्‍या ग्रामपंचायतींनाही आर्थिक लाभ होणार आहे.
                                – अनिल नागणे, गटविकास अधिकारी, संगमनेर

SCROLL FOR NEXT