कोळपेवाडी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या विविध प्रश्नांबाबत आ. आशुतोष काळे यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांची भेट घेवून सकारात्मक चर्चा केली. यावेळी कोपरगावात उपकारागृहाच्या नवीन इमारत प्रस्तावास मंजुरी मिळावी, कोपरगाव मतदार संघातील शेती महामंडळाच्या जमिनी गावठाण विस्तारीकरणास गावांना मिळाव्या, वाकडीगावच्या पाणी पुरवठा योजनेच्या साठवण तलावास आवश्यक असलेल्या शेती महामंडळाच्या जमिनीचे मुल्यांकन माफ करावे आदी विषयांवर सखोल व सकारात्मक चर्चा करण्यात आली.
यावेळी आ.काळे यांनी कोपरगावातील उपकारागृहाच्या दुरावस्थेची माहिती मंत्री विखे पा. यांच्यापुढे कथन केली. उपकारागृह इमारत अनेक वर्षांपूर्वीची आहे. सद्यस्थितीत ती मोडकळीस आल्याने तिची दुरावस्था झाली आहे. उपकारागृहात कोपरगावसह राहाता तालुक्यातील आरोपींना ठेवले जाते. कारागृहाची क्षमता कमी असूनसुद्धा एका बराकीत 10 पेक्षा जास्त आरोपी ठेवले आहेत. क्षमता वाढविण्यासाठी उपकारागृह नवीन इमारतीचा प्रस्ताव सादर केला आहे. हा प्रस्ताव महसूल ई-8 या विभागाकडे प्रलंबित आहे. या प्रस्तावास तातडीने मंजुरी मिळावी, यासाठी संबंधित विभागाला सूचना देवून सहकार्य करावे, अशी मागणी आ. काळे यांनी केली.
कोपरगाव मतदार संघातील 79 गावांमध्ये नागरिकांना आवश्यक मुलभूत सोयी -सुविधा निर्माण करण्यास ग्रामपंचायतीच्या मालकीची जागा उपलब्ध नाही. त्यामुळे सोयी- सुविधांचा अभाव आहे. लाभार्थ्यांना घरकुल मंजूर आहे, परंतु त्यांना स्वत:ची जागा नसल्यामुळे लाभार्थी घरकुलापासून वंचित आहेत. यामुळे या समस्या मार्गी लावण्यासाठी मतदार संघातील ज्या गावांमध्ये शेती महामंडळाची जमीन उपलब्ध आहे, अशा गावांना गावठाण विस्तारीकरण व सोयी- सुविधा निर्माण करण्यास शेती महामंडळाची जमीन मिळावी.
वाकडी येथील पाणी पुरवठा योजनेच्या साठवण तलावास आवश्यक असलेली स्वतःच्या मालकीची जागा ग्रामपंचायतीकडे उपलब्ध नसल्यामुळे पाणी पुरवठा योजनेचे काम रखडले. साठवण तलावाकरीता महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाची गट नंबर 216 मधील 4 हेक्टर 88 आर जागा मिळण्याबाबत प्रस्ताव दाखल केला आहे. साठवण तलावाला देण्यासाठी शेती महामंडळाने तयारी दर्शविली, परंतु या क्षेत्राची शेती महामंडळाने चालू बाजारभावाप्रमाणे येणार्या मूल्यांकनाची शेती महामंडळाने मागणी केली आहे.
ही रक्कम 1 कोटी 87 लाख 38 हजार एवढी आहे. वाकडी ग्रामपंचायतीची आर्थिक परिस्थिती एवढी मोठी नसल्यामुळे वाकडी ग्रामपंचायत जमीन मूल्यांकनाप्रमाणे एवढी मोठी रक्कम भरू शकत नाही. त्यामुळे नागरिकांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अडकला आहे. यामुळे या जागेचे मूल्यांकन माफ करून वाकडीचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्य करावे, अशी मागणी आ. काळे यांनी महसूल मंत्री विखे पा. यांच्याकडे केली. अनेक गावांमध्ये शेती महामंडळाच्या जागेवर अनेक वर्षापासून भूमिहिन नागरिक वास्तव्यास आहेत. या रहिवाशांच्या जागा नियमानुकूल कराव्या, अशा विविध मागण्या केल्या.
सर्व मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत सर्व प्रश्न सोडविण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी आ. आशुतोष काळे यांना दिली.