नगर; पुढारी वृत्तसेवा : कंपनीचा मालक असल्याची फोनवरून बतावणी करून एमआयडीसीतील एका इलेक्ट्रीक कंपनीला 19 लाखांनी एका भामट्याने गंडा घातला आहे. याबाबत कंपनीचे मॅनेजर स्वप्नील शरद कुलकर्णी (पारिजात कॉलनी, बालिकाश्रम रोड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुलकर्णी हे एमआयडीसीतील कंपनीत मॅनेजर या हुद्यावर काम करतात. बुधवारी (दि.18) कुलकर्णी यांना एका मोबाईल क्रमांकावरून कंपनीचा मालक अनुराग धूत बोलत असल्याचा फोन आला.
तसेच, हा माझा नवीन नंबर आहे, असे सांगून विश्वास संपादन केला. त्यानंतर कुलकर्णी यांनी दोन बँकखात्यात अठरा लाख 95 हजार 713 रुपये आरटीजीएसद्वारे पाठविले. तसेच, हा माझा नवीन नंबर आहे. पैसे पाठविल्यानंतर फोन करू नका मी मिटिंगमध्ये असल्याचा मेसेज कुलकर्णी यांना समोरील व्यक्तीने केल. आपली फसवणूक झाल्याचे कुलकर्णी यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ही बाब वरिष्ठांच्या कानावर घातली. त्यानंतर सायबर पोलिस ठाण्यात धाव घेत मोबाईल नंबरधारक व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले करीत आहेत.
फसवणुकीतील सात लाख मिळाले परत
फसवणूक झाल्याची माहिती सायबर पोलिसांना मिळाल्यानंतर बँक खात्यात ट्रान्सफर झालेल्या रकमेपैकी 7 लाख रुपये पोलिसांनी तक्रार यांना परत मिळवून दिले. उपनिरीक्षक प्रतीक कोळी, हेड कॉन्स्टेबल योगेश गोसावी, स्मिता भागवत, प्रीतम गायकवाड यांनी बँकेच्या नोडल अधिकारी यांच्याशी संपर्क करून ही रक्कम परत मिळवून दिली